Sunday, 20 December 2015

ती मांजरीची पिल्ले .....


काल काहीतरी घडल .. 
अस काहीतरी पाहायला मिळाल जे खूप काही शिकवून गेल .. 
कमाल असते ना ,हे आयुष्य कस कधी काय शिकवून जाईल हे कोणालाच सांगता येत नसत .. 
काल मी असच जात असताना रस्त्यावर मला काही मांजरीची पिल्ले खेळताना दिसली ,ती पिल्ले मस्त एकमेकांसोबत खेळत होती ,अगदी स्वच्छंद होऊन बागडत होती ,कसलीच चिंता न करता फक्त आत्ताचे क्षण ,आत्ताच हे आयुष्य मस्त जगात होती .. तेवढ्यात खेळणाऱ्या त्या पिल्लापैकी एका पिल्लाने रस्ता ओलांडला ,आणि ते पाहून रस्त्याने तिथूनच चालत जाणारा एक माणूस जागीच थांबला .. मांजर आडवी गेली आहे तर आता काही तरी अपशकून होणार या भीतीने तो दोन पावलं मागे गेला आणि दुसऱ्या रस्त्याने गेला .. 
         तेव्हा खरच मला प्रश्न पडला कि ,मुक्तपणे स्वच्छंदपणे जगणारी ती पिल्ले हुशार का भविष्याच्या भीतीने पावलो-पावली रस्ता बदलणारा तो माणूस ? हातात आहेत ते क्षण मनसोक्त जगणारी ती पिल्ले आणि काहीतरी वाईट होईल या भीतीमध्ये कुठेतरी जगायचंच राहून गेलेला तो माणूस ,यांच्यात खरा जगण्याचा अर्थ नेमका कुणाला समजला हे तुम्हीच ठरवा ,मला तर ते समजलं  ….. 


                                                                                                          -सुधीर (9561346672)

Monday, 16 November 2015

मी आहे इथेच बाळा ...

                      
                        आजसुद्धा ती खूप रडत होती ,संध्याकाळची वेळ होती ,आणि ती तिच्या रूम मध्ये पलंगावर बसून एकटीच रडत होती .. आणि आजच नाही तर कित्येक दिवसापासून ती असच रडत होती ,रोज या वेळेला .. शेवटी न रहावून तिची आई आली तिच्या जवळ ,तिला समजवायला ,तिच्या लाडक्या लेकीला ,तिच्या लाडक्या बाहुलीला शांत करायला .. पण आई तिथे असून सुद्धा तीच रडण थांबतच नव्हत 
                            कारण तिला आई दिसतच नव्हती .. दिसत होता तो फक्त आईचा भिंतीवरचा फोटो ,ज्यावर फुलांचा हार होता .. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात तिची आई देवाघरी निघून गेली होती ,तिला आणि तिच्या बाबांना एकट सोडून .. आणि त्या दिवसापासून तिच रडण सुरूच होत .. तिचं ते रडण पाहून आई तर तिथे येणारच होती, पण आईचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचणार कसे .. तिला रडताना पाहून कासावीस झालेली ती आई म्हणते की बाळा नकोस ग रडू ....
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा …
तुझा तो पहिला स्पर्श 
अजूनही लक्षात आहे ग माझ्या 
इवलेसे हात अन इवलेसे ते पाय 
अजूनही नजरेत आहेत माझ्या … 
शाळेच्या पहिल्या दिवशी
रडणारी ती पिटुकली
अन शाळा सुटल्यावर मग
पळत येउन बिलगणारी ती चिमुकली .. 
शाळेला रोज जायला लागली तेव्हा 
अगदी सकाळी सकाळी उठायची तू 
आई हे दे अन आई ते दे म्हणत 
अख्ख घर डोक्यावर घायची तू … 
 जेवताना हे हवं ते नको
असा किती सारा हट्ट करायची
पण कधी मला आजारी पाहिलं
        की जवळ येउन लाड करायची  .. 
बाबांची खूप लाडकी आहेस तू 
पण माझाही जीव आहे ग तुझ्यात 
रडू नकोस आता अशी 
मी जिवंत आहेच न तुझ्यात .. 
रडताना पाहिलं तुला कधी 
तर जीव अगदी कासावीस व्हायचा 
गोड बोलून तुला शांत केल तरी 
एकांतात मात्र माझ्याही अश्रूंचा बांध तुटायचा … 
खेळताना खुपदा पडायची तू
पण जखम व्ह्यायची मला   
आता तुला रोज रडताना पाहून
खूप त्रास होतो ग मलाच …
तुझ ते गोड हसण पाहायसाठी
मला सात जन्मसुद्धा कमीच पडतील
नको हिरावून घेऊ ते हसण माझ्यापासून
नाहीतर माझ्या अश्रुंचे बांध सारखेच फुटतील ..
मी आहे इथेच तुझ्या जवळ
अजिबात दूर नाहीये बाळा
पूस ते डोळ्यातलं पाणी
अन छानस गोड हसं ना बाळा ..
कमजोर पडू नकोस कधी
मी आहेच तुझ्या सोबतीला
माझी मुलगी आहेस तू
हे पण दाखवून दे या जगाला ..
कितीही संकट आली तरी
मागे वळून पाहू नकोस
एकदा "आई" अशी हाक मार 
बाकी जगाची चिंता करू नकोस ... 
थांबतील माझे शब्द जरी 
भावना तुझ्यापर्यंत येतच राहतील 
नसले मी शरीराने जरी 
वेड मन माझ तुझ्याकडे येतच राहील .. 
जाते आता मी बाळा 
एकदा पाहूदे तुला मन भरून 
तुला पाहण्यासाठीच फक्त 
आलेय मी स्वर्गही सोडून ... 
मी आहे इथेच तुझ्या जवळ 
दूर नाहीये बाळा 
पूस ते ते डोळ्यातलं पाणी 
अन छानसं गोडं हसं ना बाळा … 
एकदा छानस गोड हसं ना बाळा .. 

आईचा आवाज तर नाही पण त्या मायेच्या भावना ,या तिच्यापर्यंत पोहोचल्या कदाचित .. हळू हळू तीच रडण थांबत गेल ,आणि काही वेळाने बाबा आले घरी आणि ती बाबांसोबत गप्पा गोष्टी मध्ये रमून गेली .. आणि बाबांनी तिला खूप हसवलं ,इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून .. तेव्हाच तिथल्या आईच्या फोटोवर तिची नजर गेली ,आणि एक हलकास हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं ...  आणि तिला हसताना पाहून कुठूनतरी तिला पाहत असलेल्या त्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा हलकस हसू उमटलं ....  



                                                                                                                          - सुधीर (9561346672)

Monday, 19 October 2015

ते रुईच फुल …



                     एक तो आणि एक ती ..
                   काही वर्षांपूर्वी एकमेकांचे मित्रमैत्रीण असणारे ते दोघे कधी कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्या दोघांनाही कळल नाही .. मग हळू हळू त्यांच्यातल प्रेम खुलत गेलं ,त्याच्यासाठी तर ती म्हणजे अख्ख जगच बनली होती ,त्याची लाडाची बाहुली बनली होती .. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावं हेच त्याला वाटायचं ,एखाद लहान मुल जस त्याच्या खेळण्यातल्या बाहुलीची अगदी मन लावून ,जीव लावून काळजी घेत ना तसं तो तिची काळजी घ्यायचा ..  ती ,सहसा कोणाशीही न बोलणारी ,शांत शांत राहणारी अशी ,त्याच्यासोबत बोलताना मात्र एकदम बदलून जात होती ,खूप बोलायची ,मनातल सर्व त्याला सांगायची .. त्याच्या रूपाने तिला एक खास दोस्त मिळाला होता ,एक दोस्त ,एक सखा … 
                     एके दिवशी ती तिच्या घरी होती ,संध्याकाळचे सहा वाजले होते ,ती तिच्या रूमच्या खिडकीत उभी राहून बाहेरची थंड हवा चेहऱ्यावर घेत होती ,तेवढ्यात एक 'म्हातारी' म्हणजेच रुईच फुल उडत आल ,त्या उडणाऱ्या फुलाला पाहताच तिने लगेच हात पुढे केला आणि ते रुईच फुल अलगदपणे तिच्या हातावर विसावलं .. तिने त्या फुलाकडे पाहिलं आणि एक विचार तिच्या मनात आला तसा तिचा चेहरा एकदम खुलला ,तिने डोळे झाकून त्या हलक्या अशा फुलाला एक नाजूक अशी फुंकर मारली ,आणि बघता बघता ते फुल बाहेरच्या हवेसोबत ,हवेच्या झोक्यासोबत हळू हळू उडत गेल आणि काही वेळाने ते दिसेनास झाल  ..
                     मग तिने याला भेटल्यावर सांगितलं कि तिने तिच्या प्रेमाची आठवण म्हणून एक रुईच फुल हवेसोबत पाठवलंय ,आणि आज ना उद्या याच्यापर्यंत ते फुल उडत उडत पोहोचेलच कारण तिने त्या फुलाला तिच्या प्रेमाची शप्पथ देऊन फुंकर मारली होती  .. तिच्या मनातला हा भोळेपणा पाहून तो गालातल्या गालात हसला ,आणि त्याला खूप कौतुक वाटल या पागलपण च .. शेवटी ती त्याची छोटीसी गोड अशी बाहुली होती ,त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक तर वाटणारच त्याला .. म्हणून गालातल्या गालात हसत तो तिच्याकडे फक्त पाहत राहिला बराच वेळ ..   
                     आज तीन वर्षानंतर तो अशाच एका संध्या काळी त्याच्या घराच्या खिडकीजवळ येउन थांबला होता ,बाहेर थंड अशी हवा सुटली होती .. तेवढ्यात एक रुईच फुल हवेसोबत उडत येताना त्याला दिसल .. आणि तो उभा असलेल्या खिडकीच्या कठड्यावर ते फुल विसावल .. त्याने ते फुल एकदम अलगद अस हातावरती घेतलं .. ते पाहताना त्याच्या डोळ्यात एकदम पाण्याचे दोन थेंब तरळले आणि गालातल्या गालात हसू पण आलं त्याला .. एक वर्षापूर्वीच तीच लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी झालं होत .. आई-वडील आणि तो ,यांच्यामध्ये तिने आई-वडिलांना निवडल आणि त्यांच्या मर्जीनुसार तिने लग्न केल .. आणि या निवडीबद्दल त्याने तिला कधीच दोष नाही दिला कारण ही निवडच तशी अवघड होती ,आणि त्याच्या बाहुलीसाठी तर किती अवघड होती हे त्याला माहित होत .. 
                 आज हा खिडकीत एकटाच उभा होता ,हातात ते फुल घेऊन .. तिच्या आठवणीने डोळ्यात पापाण्यापर्यंत आलेले ते पाण्याचे थेंब आणि ओठांवर उमटलेल ते हलकस हसण .. अस अश्रू आणि हसू यांचा अनोखा मिलाप त्याच्या चेहऱ्यावर होता .. कदाचित हेच प्रेम असत .. पण आयुष्य कोणासाठी थांबत नसत .. कितीही कटू असल तरी ते सत्य स्वीकारून पुढे जाव लागत .. त्याने एकदा त्या फुलाकडे प्रेमान पाहिलं आणि एक हलकीशी फुंकर मारून त्या फुलाला पुन्हा हवेसोबत पाठवलं .. बराच वेळ हवेमध्ये झोके खात ते फुल काही वेळाने दिसेनास झाल ,पण त्याच्या चेहऱ्यावरची ते हलकस हसू आणि डोळ्यातले ते कोरडे झालेले थेंब बराच वेळ तसच होते ..
                           कदाचित हेच आयुष्य असत .. कदाचित हेच प्रेम असत ..  


                                                                                         - सुधीर 

Monday, 5 October 2015

प्रेमाबद्दल अगदी थोडस …


                     प्रेम .. आहेत तस अडीचच अक्षर ,पण या अडीच अक्षराभोवती आत्तापर्यंत अक्षरशः लाखो कविता ,हजारो कहाण्या ,कित्येक गीत लिहिले ,वाचले गेले .. या प्रेमाबद्दल असलेले गीत आपण मन लावून ऐकतो ,सिनेमे आवडीने पाहतो ,प्रेमावर असलेल्या कविता वाचतो .. पण अस असूनपण अजूनही जेव्हा समोरच्या व्यक्तीसमोर आपलं मन ,आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायची वेळ येते तेव्हा ना हे सर्व पाहिलेले अन वाचलेले अन लिहिलेले शब्द एका  क्षणात साथ सोडून कुठेतरी दूर निघून जातात ,आणि दुरूनच गुपचूप आपली होणारी फजिती पाहतात ...
                 ही प्रेम व्यक्त करायची भानगड आणि त्यातली गम्मत खरी आम्हा मुलांच्या बाबतीत हमखास दिसून येते .. जेव्हा एखाद्या मुलाला एखाद्या मुलीवर प्रेम व्यक्त करायचं असेल तेव्हा त्या बिचाऱ्याला वर म्हणल्याप्रमाणे शब्द तर मिळत नाहीतच ; पण समजा कसबस खूप प्रयत्न करून त्या बिचाऱ्याला काही शब्द सुचलेच तरी त्या मुलीला याने शब्दातून व्यक्त केलेलं याच्या मनातलं प्रेम कितपत समजेल अशी शंका त्याच्या मनात राहतेच आणि याच शंकेमुळ प्रेम व्यक्त कारण आणखीन अवघड होऊन बसत ..
तेव्हा तो बिचारा हेच म्हणत असेल कि ,
  तुझ्याशी मला बोलायचंय थोडं
 मनातलं काही सांगायचय थोडं
 पण तुला समजेल कि नाही
   याचंच मला पडलंय कोडं ….
                  तर असा हा व्यक्त होऊनपण अव्यक्त राहणारी प्रेमाची भावना .. अशा या प्रेमाबद्दल मी आणखी काय लिहिणार ,बस एवढच म्हणू शकेन की या अव्यक्त भावनेला माझा सलाम ….


                                                                                                            - सुधीर

Sunday, 27 September 2015

एक चारोळी ...

               
               काल एक पुस्तक विकत घेण्यासाठी दुकानात गेलो असताना ,तिथ हव ते पुस्तक तर नाही मिळाल ,म्हणून दुकानातून बाहेर पडताच बाहेर फुटपाथ वर जुनी पुस्तकं विकणाऱ्याकडे माझ लक्ष गेल .. या पुस्तकाचं काय असर आहे माझ्यावर माहित नाही ,पण पुस्तक पाहिलं की माझी पावलं त्यांकडे आपोआप ओढली जातात ..
                मी त्या ठिकाणी गेलो आणि पाउलो कोएलो या माझ्या आवडत्या लेखकाचं "Like the flowing river" हे पुस्तक मला तिथ दिसलं ,मी उत्सुकतेने ते हातात घेऊन पुस्तकांची पान चाळली तर त्यामध्ये एका कागदावर कुणीतरी लिहिलेली ही चारोळी माझ्या हाताला लागली  .. हि चारोळी मी वाचली आणि माझी उत्सुकता अजून वाढली ,म्हणून अजून एखादी लिहिलेली चारोळी आहे का हे पाहायसाठी मी पुस्तकाची पाने चाळायला लागलो ,पण दुसर काही नाही मिळालं ,फक्त मधल्या एका पानावर इंग्रजी मधलं 'S' हे अक्षर छान अस सजवल होत .. कदाचित हे त्या व्यक्तीचं नावाच्या सुरूवातीच अक्षर असावं .. मग मी ते पुस्तक विकत घेतलं आणि घरी येउन ती चारोळी वाचली .. ती चारोळी अशी आहे ..

जगता जगता वाटलं की काहीतरी वेगळ करावं
रोजची काम सोडून काहीतरी वेगळ करावं
हृदय तर  धडकत रोजचं  आज त्याला जरा नीट ऐकावं
मन तर इकडे तिकडे जातच रोज पण आज मी पण त्याच्यासोबत  जावं  .... 

                 ही चारोळी ज्या कोणी मुलान किंवा मुलीन लिहिली असेल ती/तो कुठ असेल माहित नाही ,पण रोजच्या जगण्यातून मार्ग काढत काहीतरी वेगळ करायचा तो रस्ता ,ती वेगळी वाट त्या व्यक्तीला मिळाली असेल ,असाच विचार आणि मनोमन सदिच्छा करून ,तो चारोळीचा कागद माझ्या डायरी मध्ये ठेवला आणि मी ते पुस्तक वाचायला सुरु केल .. 

                                                                                                - सुधीर

Sunday, 13 September 2015

थेंब ...


               
                 बाहेर मुसळधार पाऊस सुरु आहे .. पाऊस कसा पडतो हे लहानपणापासून इतक्यावेळा पाहूनसुद्धा आज तो कसा पडतोय हे पाहायला पाय खिडकीकडे वळलेच .. खिडकीमधून बाहेर पाहिलं ,तेव्हा सगळीकडे दिसले थेंबच थेंब ,वाऱ्याच्या झोतामध्ये इकडे तिकडे उडणारे लाखो थेंब .. खूप जोरात जमिनीवर आदळत होते ते थेंब ,खाली कोण आहे ,आपण कशावर आदळू याचा जरापण विचार न करता बस जोरात पडायचं बहुधा याच विचाराने पछाडलेले हे थेंब .. जणू इतके दिवस आकाशाने ,त्या काळ्या ढगांत त्यांना बंदिस्त करून ठेवल होत ,आणि आत्ता त्यांची सुटका झाली ..
             या मोकळेपणाने पडणाऱ्या थेंबांना पाहून एक क्षण मला त्यांच्या मोकळेपणाचा ,त्यांच्या बिन्दास्त असण्याचा हेवा वाटला .. यांना पाहताना अस वाटल कि मी पण एक थेंब व्हावं आणि अलगद या खिडकीतून बाहेर जाव ,हा वर नेईल तिकडे ,हि हवा म्हणेल तिकड उडावं ,आणि अलगदपणे एखाद्या नुकत्याच फुललेल्या फुलाच्या कळीवर किंवा एखाद्या वाऱ्याच्या झोतामध्ये नाचणाऱ्या झाडाच्या छोट्याशा पानावर जाऊन विसावं .. तेवढ्यात टेबलावरच्या पुस्तकांची पाने वाऱ्याने सळसळ आवाज करू लागली आणि मी त्या थेंबांच्या तंद्रीतून बाहेर आलो .. मी त्या पुस्तकांकडे पाहिलं ,आणि एकदा बाहेरच्या पावसाकडे पाहिलं .. मग विचार आला की कितीही मोकळ व्हावं वाटत असाल तरी आपल्याला आपल कर्म ,आपल जीवनध्येय विसरून नाही जमत .. ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना The warrior of Light has to perform his duties ..  तसच काही … 

                                                                                                      -सुधीर

Wednesday, 9 September 2015

Art of Living ....



             Art of living .. म्हणजे जगण्याची कला .. नुकतच एका मित्राने हा क्लास केला .तो मलापण म्हणत होता की कर तू हा क्लास .मी विचार करेन म्हणालो .त्या क्लास मध्ये योग ,प्राणायाम आणि काही व्यक्तिमत्व सुधारणा करायच्या गोष्टी शिकवल्या जातात अस ऐकण्यात आलं .पण मग याला आर्ट ऑफ लिवींग का म्हणतात ? आणि माझ्या मनात हाही विचार येत आहे कि मुळात जगण्याची कला ही कुठल्या क्लास मध्ये शिकायची गोष्ट असते का ,माझ्या मते तर ती कला जगण्यातून आपोआप शिकत जायची असते . 

          जगण .. एक अशी कला आहे जी समजून घेण्यातच बऱ्याच जणांच आयुष्य निघुन जात ,तर बऱ्याच जणांना ते समजून घायची नसतेच .त्यांना फ़क्त रोजच रुळलेल आयुष्य कसतरी संपवायच असत ,पण बरेच असेही लोक आहेत जे या जगण्याच्या कलेला समजून घेण्याचा प्रयत्न करतात .म्हणून त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात जगण्याविषयी ,की आयुष्य अस का आहे ,आयुष्यात अस का होत ,कालपरवा सगळ छान सुरु असताना मध्येच काहीतरी समस्या का येते ,सुख हे नेहमी दुःखच्या कड़क उनानंतर येणाऱ्या थंडगार अशा सावली सारखच अगदी काही क्षणांसाठीच का येत ,त्या निळ्याशार आकाशासारख ते कायम आपल्या भोवती का राहत नहीं ,असे अनेक प्रश्न . मग ही माणसे आपापल्या परीने या प्रश्नांना शोधतात ,काही जण आयुष्याबद्दल लिहितात ,तर काही जण त्याच वाचन करतात ,काही जण रंगांमध्ये आयुष्य रंगवतात तर काहीजण संगीतामध्ये हरवून जातात ,काहीजण स्वतःला आजूबाजूच्या नात्यांमध्ये गुंतवून त्यात आयुष्य शोधतात तर काहीजण नात्यांच्या गोतावळ्यातून बाहेर पडून या समाजासाठी काहीतरी करतात ,पण हे सर्व करताना ही सर्व माणसे एक प्रकारे त्यांच्या जगण्याची कलाच शिकत असतात ,नाही का …. 

        या प्रश्नांची उत्तर ज्याला त्याला ,त्याच्या-त्याच्या कुवतीनुसार मिळत जातात ,अणि जगण पुढ जात रहत .मला मिळालेलं उत्तर म्हणजे ही जगण्याची कला म्हणजे दूसर तीसर काही नाही तर फक्त पुढे वाहत जायच ,एखाद्या नदीसारख .. उगमाच्या वेळी असणारा आयुष्याचा छोटासा प्रवाह पुढे जाउन अवाढव्य पात्र बनत ,ज्या पात्रात जागोजागी ,वळणावळणावर येउन मिळालेले असतात अनेक इतर प्रवाह ,अनेक इतर नद्या .अशा या सर्व प्रवाहांना आपल्यात सामावून घेऊन रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर स्वतःचा मार्ग स्वत शोधत ,अनेक खाच खळगे पार करत पुढे जात राहयच . वाहत जाताना रस्त्यात किनारी असणाऱ्या चविष्ट सुखाच्या झाडाच्या पडलेल्या फळांना आपल्यात सामावून घ्यायचं पण त्या झाडाचा मोह न करता हा प्रवास पुढे चालू ठेवायचा ,कधी आनंदाचा उंच धबधबा होऊन खाली पडायचं ,तर कधी निराशेची नागमोडी वळण घेत तिथून बाहेर निघण्याचा आपला रस्ता शोधून काढायचा . 
          कधी कधी एखाद वळण असही येत जिथुन पुढ वाट शोधन अवघड होत ,तरीसुद्धा त्यातून मार्ग काढून हा जगण्याचा प्रवाह चालू ठेवायचा ,मार्गात अनेक मोठे दगड सुद्द्धा येतील ,अतिशय ओबडधोबड ,त्या दगडांना सुद्धा आपल्या शीतल ,प्रेमळ प्रवाहाच्या माऱ्याने गुळगुळीत करत पुढे जात रहायचं .कधी घनदाट जंगलातून जाव लागत ,काही काही जंगलं तर इतकी घनदाट असतात की तिथे सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही ,तेव्हा तिथल्या अंधाराला न घाबरता ,आपला मार्ग न सोडता पुढे जात राहायचं .हा पूर्ण प्रवास सुरु असताना ,भेदभाव न करता जो जो प्रेमासाठी तहानलेला असा कोणी आपली ओंजळ पुढ करेल त्याला या प्रवाहातल थोडस प्रेम देऊन त्याची तहान भागवायची आणि असंच मजल दरमजल करत नेहमी ,प्रत्येक क्षणाला ,बस न थांबता पुढे जात राहायचं आणि शेवटी मृत्युरूपी सागरात विलीन व्ह्ययच .हेच असत आयुष्य अणि हेच असत जगण .
      मार्गात कितीही अडथळे आले ,कितीही अडचणी आल्या ,वाहून वाहून शरीर थकल तरी न थांबता हा आयुष्याच्या प्रवाह सतत वाहता ठेवण ,हीच आहे खरी जगण्याची कला .. जस नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाला पाहिलं कि आपल्या मनाला एक विलक्षण शांतता जाणवते ,तसाच आपणही ही जगण्याची कला अशी जोपासायची की आपल जगण पाहणाऱ्याला सुद्धा मनाला शांतता जाणवली पाहिजे .. 

     ही कला आयुष्याची ,ही अशीच जगता जगता शिकायची असते ,शिकता शिकता जगायची असते … 

                                                                                                            - सुधीर 



Monday, 31 August 2015

आठवण येतेय एका मुलीची ....


                      परवा एका मुलीची ,एका मैत्रिणीची खूप आठवण येत होती ,बहुधा सध्या ती बरीच दूर ,महाराष्ट्राच्या सुद्धा बाहेर असल्याने कदाचित .. या ब्लॉग वरची पहिली कविता सुद्धा तिच्याच साठी होती ,आणि आजची हि कविता सुद्धा तिच्याच साठी आहे .. आणि जेव्हा हे शब्द सोबतीला असतील तेव्हा मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे दूर असलेल अंतर सुद्धा आडवे नाही येत.. म्हणून त्या माझ्या मैत्रिणीसाठी एक खास कविता ,काही ओळी माझ्या मनातल्या ,काही भावना माझ्या मनातल्या ,एक संदेश माझ्या मनातला ... 
                                 
आठवण येतेय एका मुलीची 
आयुष्यात आलेल्या 
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची 
आठवण येतेय 
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची … 

जन्म झाला तिचा तेव्हा 
हळूच चोरून बघायचो तिला 
आईच्या कुशीत निजलेल्या 
त्या बाळाची 
उगाचच का भीती वाटायची बर मला … 

आईच्या कुशीत हि कोण आली 
म्हणून कदाचित 
भीत असेन मी तिला 
तरीपण रडण ऐकू आल की 
चोरून बघत असेन मी तिला … 

एकदा धीर धरून गेलो तिचा जवळ 
आई म्हणाली जवळ  हिला 
अरे वेड्या छोटी दीदी मिळाली तुला … 

आता आठवत नाहीये की 
बाळाला त्या पाहून काय बोललो असेन 
पण छोटस ते गुबरु बाळ पाहून 
मी गालातल्या गालात हसलो नक्की असेन 

तीच होती माझी दीदी ,आणि 
जी झाली माझी पहिली-वाहिली मैत्रीण 
तिच्यामुळे शिकायला मिळालं 
काय असत भाऊ असंण ,
आणि काय असत 
कुणालातरी आपल मानून 
तिची काळजी घेण .. 

तेव्हा जी होती जवळ खूप माझ्या 
आहे आहे ती खूप दूर 
पण संपेल हा दुरावा सुद्धा 
येईल आमचा दिवससुद्धा ,
जेव्हा ती असेल ,आणि मी असेल 
आणि असेल आमची मस्ती … 

ते एकमेकांच्या खोड्या काढण ,आणि 
आई बाबांचं लाडक कोण यासाठी 
नेहमी नेहमी भांडण ,
भांडून झाल की रुसवा फुगव धरण 
अन हळू हळू पुन्हा बोलायला लागण … 

आज आठवण येतेय त्या मस्तीची ,
आठवण येतेय त्या मुलीची 
आयुष्यात आलेल्या 
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची 
आठवण येतेय 
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची … 

Missing You ....To my didi ,my sister 
From your bhaiya ... 


                                                                                                 -सुधीर
                                                                                -




Wednesday, 26 August 2015

त्या अनोळखी वाटा …


                                 ती अनोळखी सफर
                                 त्या अनोळखी वाटा …
               अशीच एक काहीसी अनोळखी सफर मला करावयास मिळाली .. प्रत्येक सफर काहीतरी नवीन शिकवते अस म्हणतात ,तसच या सफरीतून मी एक गोष्ट नक्की शिकलो ,कि समोर येणाऱ्या अनोळखी वळणांना घाबरण्यापेक्षा ,त्या वळणांच्या पुढे काय आहे याची चिंता करण्यापेक्षा त्याला सामोरे गेलात तर त्या वळणाच्या पुढे तुम्हाला सापडेल अस काही सौदर्य ,असा काही अनुभव ,असे काही क्षण जे अपेक्षेपेक्षा जास्तच काहीतरी देतात आपल्याला .. 
              मित्रांसोबत गेलेल्या या सफरीत ,रस्त्यात अचानक अशी काही अनोळखी वळणे ,अशा काही अनोळखी वाटा येत होत्या ,तेव्हा अस वाटायचं कि या वळणावरती पुढे जायचं का नाही ,या अनोळखी वळणाच्या पुढे काय असेल ,जे असेल ते धोकादायक तर नसेल न ,या अनोळखी वाटेने पुढे गेलो तर परत येताना काही अडचण तर नाही ना येणार ,अशा एक ना अनेक प्रश्नांनी ,शंकांनी मन भरल होत .. तरी आम्ही ती अनोळखी वळण पार केली ,त्या अनोळखी वाटांवर पुढे जात राहिलो .. आणि कमालीची गोष्ट म्हणजे ,आम्हाला प्रत्येक वळणानंतर अशा काही जागा दिसल्या ,अशा काही घटना घडल्या ,अशा काही गोष्टी आम्हाला करायला मिळाल्या ,कि त्याच गोष्टी ,त्याच क्षणांनी प्रवासाच्या परतीच्या वेळेस आमच्या चेहऱ्यावर हसू आणलं ,त्याच क्षणांनी आम्हाला एक अतिशय सुंदर अस आठवणींचा साठा दिला जो आम्ही कायम सोबत ठेऊ आणि तो आठवून गालातल्या गालात हसू सुद्धा ..                
                आपल आयुष्य पण असच काहीस असत नाही का ,प्रत्येक येणारे अनोळखी वळण ,प्रत्येक येणारी अनोळखी व्यक्ती काहीतरी जगण्याचा अनुभव शिकवते आपल्याला .. एका अनोळखी मुलासोबत क्लास मध्ये सहज म्हणून बोललो ,आणि आज तो माझा जिवलग मित्र आहे ,एका अनोळखी मुलीला काळजीने दोन शब्द बोललो तर ती आज माझी मानलेली बहिण आहे ,अनोळखी शहरात कोणासोबत तरी बोलायची सुरुवात झाली आणि तेच पुढे कायमचे मित्र झाले आणि जे जे कोणी आयुष्यात आहेत ,ते सर्व त्या क्षणाला अनोळखीच होते .. पण त्या वेळेला ,त्या अनोळखी वाटेने गेल्याने आज हि नाती आहेत माझ्या आयुष्यात .. जर पुढे काय होईल या विचाराने त्या अनोळखी वाटेने गेलोच नसतो तर कदाचित ही आज अनमोल अशी वाटणारी सर्व नाती कदाचित नसती माझ्या आयुष्यात ..  हो ,अशा अनोळखी वळणांवर कधी कधी त्रास सुद्धा झाला ,मन सुद्धा दुखावल गेल ,मात्र तो हि अनुभव आयुष्याच्या शिदोरीत कधीतरी कामाला येईलच .. 
               मला मान्य आहे की ,ओळखीच्या वाटांनी जाताना चांगल वाटत ,आणि अनोळखी वाटा थोड्याशा भीतीदायक वाटतात .. कारण माहित नसलेल्या गोष्टीना आपण थोडफार का होईना पण भीतच असतो .. पण तीच भीती बाजूला सारून पुढे जात राहिलो तरच आयुष्याची हि अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या क्षणांनी ,घटनांनी भरत जाते ,आणि याच शिदोरीला आपण जगण अस म्हणतो ,नाही का ..
                            म्हणूनच ..
                                ती अनोळखी सफर ,त्या अनोळखी वाटा
                                जगण म्हणजे  हेच
                                जगण्याच्या अथांग समुद्रावर ,अनोळखी अशा क्षणांच्या लाटा ……


                                                                                                                   -सुधीर

Saturday, 22 August 2015

तुझा साथ हवा आहे ....


                      अस नेहमी म्हणतात कि माणूस या जगात एकटाच येतो आणि जाताना एकटाच जातो .. कदाचित अस असेलही ,पण हे येण आणि हे जाण याच्या दरम्यान जो 'जगण ' नावाचा भाग असतो ,त्या मध्ये आपण एकटे नाही राहू शकत .. आपल्याला गरज असते एका साथीची ,साथ देणाऱ्या अशा साथीदाराची जो या जगण्याला खऱ्या अर्थाने 'जगण' बनवतो .. मग तो साथीदार ,ती साउली जी आयुष्यात आल्यावर आयुष्य कस असेल याबद्दल माझ्या मनातल थोडस .. 
                                                               

 तुझी मैत्री हवी आहे 
तुझा हात हवा आहे
    जीवनात आता प्रत्येक क्षणी 
    तुझा साथ हवा आहे …… 
  
  तुझा राग तुझा रुसवा 
माझ्यावरती असायलाच हवा
   पण त्या रागात कुठेतरी
    प्रेमाचा पाझर असायला हवा ……


तुझ हसण तुझ बडबड करण 
मला ऐकायचं आहे नेहमी 
आणि ते ऐकत असताना 
        त्या तुझ्या बोलण्यात हरवायचं नेहमी ……


तु हसताना मला तुला पहायचंय  
मात्र तू रडली कि तुला खूप खूप हसवायचं 
तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात 
तुला फक्त आणि फक्त आनंदात पहायचंय ……


तुझे शब्द हवे आहेत 
ज्यांनी मला आधार दिला 
आता तुला सर्वस्व बनवण्याचा 
मी पक्का इरादा केला .....


तुझ प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी 
द्यायची आहे मला तुझी साथ 
आता तुझी स्वप्न पूर्ण करण 
हीच माझ्यापण स्वप्नांची वाट ..... 


माझ्या या भावना समजून घ्यायला 
तुझा समंजसपणा हवा आहे 
मी आहे थोडसा वेडाखुळा
म्हणून तुझा साथ हवा आहे ..… . 
                                                                  तुझा साथ हवा आहे ......… 


                                                                                                  -सुधीर 

Wednesday, 19 August 2015

ओ रे मनवा तू तो बावरा है ....


                                  'ओ रे मनवा तू तो बावरा है' .. हे हिंदी गीत ऐकता ऐकता मनात विचार आला कि खरच रे मना ,तू किती वेडा आहेस .. तू कधी कुठ कसं धावशील हे सांगता येत नाही .. कधी या वाटेने तर कधी त्या वाटेने ,नेहमी कशाच्यातरी मागे ,कोणाच्यातरी मागे ,कधी स्वप्नाच्या मागे तर कधी सत्याच्या मागे ,तू नेहमी धावत असतोस ..
                 खरच वेड असतं हे मन .. याला जगाची दुनियादारी अजिबात समजत नाही .. हा आपला स्वतःच्याच नादात असतो .. कोणीतरी आवडलं कि तिच्याच मागे धावत बसतं ,ती समोर असो वा नसो मात्र याला काहीच फरक नाही पडत .. कोणी थोडस प्रेम दिल कि लगेच पघळतो ,आणि कोणी जरासं मनासारख नाही वागाल तर लगेच रुसून फुगून बसत .. अशा रुसलेल्या फुगलेल्या मनाला मनवायची पण गरज नसते मग ,समोरच्या व्यक्तीच्या सोबतीमध्ये हे मन झालेलं सर्व आपोआप विसरून जात ,इतक साध भोळ असत हे मन ..
                  मनापासून साथ देण हे खर तर मनाकडून शिकावं ,कोणतीही परिस्थिती असो ,कोणताही प्रसंग असो ,हा नेहमी साथ आणि साद देत असतो .. काही चुकीचं करत असेल तर 'हे चूक आहे ' अशी साद देणार हे मनच असत ,आणि काही योग्य अस करत असेन तर माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवायचं काम हे मनच करत .. याला आवडणाऱ्या व्यक्तीचे शंभर नखरे सुद्धा हा हसत हसत सहन करेल पण नावडत्या व्यक्तीने एक जरी चूक केली तर हे त्याला कधीच माफ न करायच्या अविर्भावात त्याकडे पाहते ..
                खरच हे मन नसत तर जगायची मजा आलीच नसती .. कितीही वय झाल तरी आपल्या आतल ते लहानपण ,तो लहान निष्पाप मुल जिवंत ठेवायचं काम हा मनच करतो .. मन खर तर आपल्या आतलं ते खट्याळ खोडकर बाळच असत .. पहा ना ,हे याला जे आवडेल तेच करत ,आवडेल तिकडेच धावत ,आणि याला आवडत नसेल ते करायला लावलं कि मात्र लगेच बंड करून उठत ,छोट्या छोट्या आनंदात हे अगदी मनसोक्त नाचत ,आणि छोटस दुख आलं कि लगेच रडायला लागत .. अस हे लहान मन ,जेव्हा मोठेपणा दाखवायचा प्रसंग येतो तेव्हा  हे डोळस ,हुशार व्यक्तीलाही मागे टाकत ,म्हणूनच कदाचित 'मनाचा मोठेपणा' हा वाक्यप्रचार रूढ झाला असावा .. 
               अस हे वेड मन ,हे वेड आहे म्हणूनच जगायची मजा अनुभवता येते .. नाहीतर विचार करा ना ,की सगळेच कायम अख्खं आयुष्य डोळसपणे ,बुद्धीने ,समजूतदारपणे वागत असते तर किती कंटाळवाण झाल असत हे जग .... म्हणूनच 

ओ रे मनवा तू तो बावरा है ,तू ही जाने तू क्या सोचता है
क्यो दिखाये सपने तू सोते जागते ….  

                                                                                                  - सुधीर 

Tuesday, 7 July 2015

धाग्या-धाग्याच आयुष्य ...


           धाग्या-धाग्याच आयुष्य हे .. धागा म्हटलं कि त्याच दुसऱ्या धाग्यात विणण आलं आणि त्यातून पुन्हा उसवण आलं .. धाग्याची गोष्ट अशीच सुरु राहते ,त्याच आयुष्य हे पुन्हा पुन्हा उसवण आणि पुन्हा पुन्हा विणण यातच सामावलेलं असतं .. तशीच काही गोष्ट असते आपल्या आयुष्याची नाही का .. 
             जन्म घेताच हे आयुष्याचे धागे विणले जातात ते आई वडील यांच्यासोबत ,नंतर नातेवाईक भाऊ बहिण ,मित्र ,मैत्रिणी ,प्रियकर ,प्रेयसी आणि जस जस आयुष्य पुढे वाढत जात तस तस या आयुष्याच्या धाग्यात गुंतत जातात अनेक इतर धागे आणि त्यातून बनत जातात नात्यांचे बंध .. आणि नात्यांच्या बंधात गुंतता गुंतता मध्येच उसवण पण वाट्याला येत या धाग्याच्या .. काही बंध गुंतले जातात आणि काही उसवले जातात ,आणि हे आयुष्य बनत उसावण्या-गुंतण्याच खेळ .. पण हे उसवण आणि गुंतण इतक सोप्प असत तर ते आयुष्य कसलं .. 
              हे आपल मन या या उसवाण्याच्या आणि गुंतण्याच्या खेळात अडकलेल असत .. म्हणून तर समजून उमजून मांडलेला खेळ असो वा नकळतपणे मांडला गेलेला खेळ असो ,मन हे त्या खेळात गुंतत जातेच .. आणि मजेशीर गोष्ट अशी कि मनाला या खेळात गुंतण तर खूप चांगल जमत पण त्यातून बाहेर पडण मात्र अवघड जात .. म्हणून तर कोणी आपलं असं वाटणार जेव्हा दूर जात ,त्या नात्यातून आपल आयुष्य उसवलं जात तेव्हा चांगल नाही वाटत या मनाला .. आणि जेव्हा हा एकटेपणा दूर करणारे ,पुन्हा नव्या स्वप्नांची उमेद जागवणार कोणीतरी नवीन असं या आयुष्यात गुंतलं जात तेव्हा मात्र हे मन अगदी आनंदित होत .. 
            पण शेवटी हे आयुष्य असच आहे नाही का .. कधी गुंतायचं कधी उसवायचं .. गुंतलं कोणात हा धागा तर तो बंध घट्ट बांधायचा म्हणजे कधी सहजा-सहजी उसवू नये आणि जर कधी उसवलचं तर पुन्हा नव्या वाटा ,नवी दिशा ,नवे आकाश ,नवी स्पंदने शोधायसाठी सज्ज व्ह्यायचं आणि त्या नव्या स्वप्नांमध्ये पुन्हा नव्याने गुंतायचं  .. असच असतं धाग्या धाग्याच आयुष्य हे ......
धाग्या धाग्या सारख आयुष्य हे 
 गुंतता गुंतता उसवत हे अन 
उसवता उसवता गुंतत हे 
पण या गुंतण्याच्या उसवण्याच्या खेळात ,
या मनाला नेहमी फसवत हे
कधी उसवत तर कधी विणत हे 
धाग्या धाग्या सारखं आयुष्य हे .. गुंतण्या-उसवण्याचं आयुष्य हे ….. 

                                                                                  - सुधीर

Sunday, 31 May 2015

एका क्षणाची गोष्ट ....


एका क्षणाची गोष्ट .. 
हि गोष्ट वाचा आणि विचार करा .. 
        
                    एक क्षण होता .. त्या तिकडे दूर वरती आकाशामध्ये हसत बागडत खेळत होता .. सर्व क्षणांची राणी आणि आई होती 'वेळ' .. त्यातल्या त्यात हा क्षण त्या राणीचा सर्वात आवडता क्षण होता .. राणीचं एकच काम होत ते म्हणजे योग्य वेळेला त्या त्या क्षणांना पृथ्वीवर पाठवायचं ,वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात .. पण या सर्वाला राणीचा एकच नियम होता ,कि त्या क्षणांसोबत ती राणी फक्त आनंद पाठवायची ,दुख किवा निराशा असलं काहीच नसायचं त्या क्षणांसोबत .. यामागे राणीचा एकाच उद्देश होता कि पृथ्वीवरच्या माणसांनी ते-ते क्षण आनंदात जगावेत .. 
               हा तिचा लाडका क्षण सुद्धा वाट पाहत होता .. त्याला नेहमी वाटायचं कि कधी एकदाच मला पण खाली जायला मिळतंय आणि मी पण कोणाच्यातरी आयुष्यात आनंदाचा तो एक क्षण बनतो .. तो राणीजवळ नेहमी म्हणायचा कि मला जाऊ द्या खाली आत्ताच ,पण राणी त्याला म्हणायची कि तुझी खाली जायची वेळ नाही आली अजून .. पण अखेर एके दिवशी राणी त्याला म्हणालीच कि तुझी खाली जायची वेळ आली .. 
                 तो अतिशय आनंदाने उड्या मारतच खाली आला ,एका मुलीच्या आयुष्यातला क्षण बनायला .. ती मुलगी त्या क्षणाला एका पुलावर उभी होती ,एकटीच समोर वाहणाऱ्या नदीकडे पाहत ,डोळे मिटून ती फक्त उभी होती .. तिला आनंदित करायला हा क्षण तिच्या जवळ गेला ,त्याला वाटले तीच मन त्या क्षणाच स्वागत करेल ,अगदी मनाचे दरवाजे उघडून ,आनंदाने त्या क्षणाला ती आपलस करेल .. पण तिथे त्या क्षणाची अगदीच निराशा झाली .. 
             तो क्षण तिच्या मनाच्या जवळ गेला आणि म्हणाला कि "मी क्षण आहे ,आत्ताचा क्षण ,तू ज्याला आयुष्य म्हणतेस तो दुसरा कोणी नसून तुझ्या आयुष्यात येणारे क्षण च असतात ,तसाच मी आत्ताच तुझ आयुष्य आलोय तुझा दारात ,मी आत्ताचा क्षण आलोय ".. तेव्हा त्या मुलीचं मन म्हणाल कि "मला नाही गरज कोणत्या कशाची ,मी माझ्या माझ्या दुखात आहे ,माझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी , त्या आठवणी यांचा मला त्रास होतोय ,माझ्या मनातून ते भूतकाळ आणि त्या कटू आठवणी जातचं नाहीत , आणि मी त्याचाच विचार करत असते दिवसरात्र  ,तर तू जा निघून "..
                तो क्षण हिरमुसून गेला अगदी ,तो अगदी जीवापासून म्हणाला "अग जे तुझ्यासोबत घडल मागे तो भूतकाळ होता ,ते जेव्हा घडत होत ; तेव्हा जे क्षण तुझ्या आयुष्यात होते ते क्षण केव्हाच निघून गेले ,मी आत्ताचा नवा क्षण आलोय तुझ्या आयुष्यात ,एक नव स्वप्न घेऊन ,एक नवी उमेद घेऊन ,एक नव जगण घेऊन ,मला आत येऊ दे ,तुझ्या मनाला आनंदाने भरू दे ,मला फक्त एकदा आपलस करून तरी पहा ,या जगण्यात किती गम्मत असते ते तुला कळेल ,मला तुझ्या मनाच्या आत येऊ तरी दे ".. 
                पण त्या मुलीने ऐकलच नाही आणि तेवढ्यात या क्षणाची वेळ संपली आणि पुढचा क्षण तिथे आला .. मग या क्षणाला पुन्हा वरती राणीकडे जाव लागल .. वरती गेल्यावर हा क्षण राणीला म्हणाला कि मला त्या मुलीच्या आयुष्यात आनंद भरायचा आहे तर मला अजून एकदा जायची संधी द्या ,तर राणी म्हणाली कि "ती वेळ ,तो क्षण तिच्या आयुष्यातून निघून गेला आहे ,आता पुन्हा कधीच तिला तो क्षण नाही मिळणार "..      

               वाचलीत ना हि गोष्ट ,गोष्ट अगदी साधीच आहे ,पण आपल अख्ख जगण सांगून जाते हि गोष्ट .. हा आत्ताचा क्षण हेच आयुष्य आहे हे न समजून घेता आपण भूत आणि भविष्य यातल्याच क्षणांमध्ये अडकून बसतो आणि आत्ताचा हा क्षण ,हे आयुष्य जगायचं राहूनच जात ,नाही का .. तर अजूनही वेळ गेलेली नाही ,येणारा प्रत्येक क्षण अगदी नवा कोरा आहे अस जगा ,जे झाल ते झालंय आणि जे होईल ते अजून व्हायचंय ,मग त्यासाठी आत्ताचा क्षण जगायचं का सोडायचा … विचार करा … 

                                                                                      - सुधीर

Saturday, 11 April 2015

हा क्षण ....

             
              
                  क्षण .. कमाल असते ना या क्षणांची ,कसे बघता बघता ,आणि जगता जगता ,निघून जातात हातातून हे क्षण .. आपल्याला कळतही नाही आणि तोपर्यंत तो क्षण निघून गेलेला असतो .. आणि हा क्षण जातानाही एकदम गुपचूप आणि छुप्या पावलाने जातो बर का .. आत्ता या क्षणी मी हे लिहित आहे तो क्षणसुद्धा पण हे वाक्य लिहून पूर्ण होईपर्यंत निघून गेलेला असेल ,आणि तुम्ही हे वाचाल तेव्हा तर तो भूतकाळ बनलेला असेल .. 
              आपण सगळे जगतो म्हणजे हा येणारा प्रत्येक क्षण ,काहीतरी करतो .. काम करतो ,अभ्यास करतो ,विचार करतो ,बोलतो ,हसतो ,रडतो ,झोपतो ,खातो आणि असे असंख्य कार्ये ,जी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात आपण करत असतो ,हेच ते असंख्य क्षण म्हणजेच जीवन .. हे क्षण सगळ्यांना सारखेच तर मिळतात .. आत्ता मी हे लिहित आहे हा क्षण ,या क्षणी तुम्ही पण तुमच्या आयुष्यात काहीतरी करत असाल न ,भलेही परिस्थिती वेगळी असेल तुमची आणि माझी ,पण क्षण तर तोच आहे ना .. मग अस का होत कि काहीजणच तो क्षण पुरेपूर जगतात ,आणि बाकीचे बस त्या क्षणाला असच जाऊ देतात ,न जगता .. 
            कारण कि भरपूर लोकांना हे कळतचं नाही कि आयुष्य म्हणजे कुठली भव्य-दिव्य अशी गोष्ट नसून ,आयुष्य म्हणजे हा आत्ताचा क्षण आहे .. आयुष्य ना मागे गेलेल्या क्षणांमध्ये असते ना पुढे येणाऱ्या क्षणांमध्ये असते ,ते फक्त असते या आत्ताच्या क्षणात .. बस एवढीच छोटीसी पण अख्खं विश्व व्यापून टाकणारी संकल्पना आहे आयुष्याची ... 
              मग मला सांगा कि भूतकाळात गेलेल्या क्षणांना कवटाळून बसण्यात किंवा भविष्यात येणाऱ्या क्षणांची कल्पना करून त्याच भविष्याच्या स्वप्नात अडकून राहण्यात काय अर्थ आहे .. जो जायचा तो क्षण केव्हाच निघूनपण गेला ,आणि जो भविष्यात येणारा क्षण आहे तो केव्हा येईल ,कसा येईल किंवा येईल का नाही हे सुद्धा कोणीच सांगू शकत नाही .. मग का उगाच या भूत आणि भविष्यात अडकून राहून हातातला हा क्षण वाया जाऊ द्यायचा … 
                म्हणून आयुष्य जगायचं तर या क्षणात जगा .. हेच आयष्य आहे आणि ते सदा सर्वदा सुंदर च असतं .. आणि हे आयुष्य दुसर तिसर काही नसून ,फक्त आणि फक्त ' हा आत्ताचा क्षण ' एवढच असत .. सर्व झालेल्याच दुख आनंद आणि होणारयाच दुख आनंद सोडा ,आणि फक्त हा क्षण जगा म्हणजे आयुष्य आपोआप जगाल … 
शेवटी जाता जाता मीच इंग्लिश मध्ये लिहिलेलं एक सुंदर वाक्य सांगतो या क्षणाबद्दल  ... 
"In our life ,We lie to ourselves that we are moving forward .. Actually it is The Moment , the Time which ever truly moves forward in our life , all the time .."

                                                                                                - सुधीर
                                                                                           


Wednesday, 25 March 2015

मन आणि अपेक्षा .....

         
               
                        अपेक्षा .. आपल मन फक्त आपल्याला स्वतला वाचता येत आणि या मनात अपेक्षा फार निर्माण होतात रोजच्या जगण्यामध्ये .. फार कमाल असते या मनाच्या खेळाची आणि या अपेक्षांची .. समोरच्या व्यक्तीने माझी मनातली अपेक्षा पूर्ण करावी याचीच अपेक्षा आपण दिवसरात्र करत असतो ..  म्हणजे सांगतो 
                मित्र मैत्रीण प्रेयसी ,आई वडील ,इतकाच काय तर रस्त्यावर भेटलेला अनोळखी व्यक्ती असेल तरी त्यान माझ्यासोबत अस वागल पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो ..  म्हणजे अस एकही नात नाहीये कि ज्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा न करता राहतो .. हसण्याची गोष्ट म्हणजे आपण तर देवाकडून सुद्धा अपेक्षा करतो कि देवा माझ्यासोबत अस केल पाहिजे ,मला ते दिल पाहिजे ..  
                 आता तुम्ही म्हणाल कि आपण समोरच्या व्यक्तीने आपल्याशी कस वागावं याची अपेक्षा ठेवण्यात गैर काय .. मी अजिबात म्हणत नाही कि यात काही गैर आहे .. उलट हा तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे .. पण .. समस्या तिथे सुरु होते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा तर ठेवतो पण जर त्या व्यक्तीने ती अपेक्षा पूर्ण नाही केली तर मात्र आपण त्या व्यक्तीवर चिडतो , मनातल्या मनात त्या व्यक्तीलाच दोषी मानू लागतो , तुमच्या मनातली अपेक्षा पूर्ण न केल्याबद्दल किंवा तुमच्या मनाप्रमाणे न वागल्याबद्दल .. 
                 आता विचार करा , आत्तापर्यंत  जितक्या पण वेळेला तुम्ही कोणावरही रागावलात किंवा भांडलात , ते खरच त्याची चूक होती म्हणून कि तुमच्या मनाप्रमाण ती व्यक्ती नाही वागली म्हणून .. तुम्हाला दिसून येईल कि समोरच्याची चूक असण्याच्या घटना फार कमी ,पण तुमच्या मनासारख , तुमची अपेक्षा होती तस ती व्यक्ती वागली नाही म्हणूनच तुम्ही भांडलात ,रागावलात ,कधी कधी तर त्यांच्यापासून दूर सुद्धा निघून गेलात 
                 पण खरच या जगात कोणीपण कोणाच्याही अपेक्षेप्रमाणे ,मनाप्रमाणे वागू शकत का ?  नाही ना .. आणि याच तेवढच स्पष्ट अस उत्तर हे आहे कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमच्या मनात नेमक काय आहे हे समोरच्या व्यक्तीला जसच्या तस समजण अजिबात शक्य नाही .. कारण तुमच्या अपेक्षा या तुमच्या मनात जन्म घेतात ,आणि तुम्ही कस काय अपेक्षा ठेऊ शकता कि तुमच्या मनात निर्माण झालेली अपेक्षा समोरच्या व्यक्तीन तंतोतंत ओळखून त्यानुसार वागाव ..   
             यासाठी एक छोटस सत्य लक्षात ठेवा कि तुमच मन फक्त आणि फक्त तुम्हालाच वाचता येत , म्हणून समोरच्याला स्पष्ट शब्दात सांगा तुमच्या अपेक्षा , सांगा कि तुम्हाला अस अस वाटते आणि त्यान तसं तसं कराव अस तुम्हाला वाटत .. पण समोरच्याला न सांगता , त्याने तुमच्या मनातल अगदी तंतोतंत ओळखाव आणि त्यानुसारच वागाव अशी अपेक्षा ठेवून उगाच सारखा सारखा अपेक्षाभंग करून घेण्यात अर्थ नाहीये ..  याने फक्त माणस दुरावतात आणि नाती बिघडतात .. म्हणून संवाद वाढू द्या ,मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगा , मग बघा अपेक्षा आपोआप कमी होतात आणि आयुष्य सुंदर होऊन जाते … 
                                     याबाबतीत इंग्लिश मध्ये एक छान वाक्य आहे .. 
Before You 'Assume' ,try this crazy method called 'Asking'  ... बरोबरच आहे ,नाही का …. 

                                                                   - सुधीर
                                                                    

Sunday, 15 March 2015

तुझ नि माझ नात …


       काही काही नाती अशी बनतात कि त्यांची गोष्ट च निराळी असते .त्याचं एकत्र हसण ,त्याचं एकत्र रडण ,त्याचं एकमेकांना समजून घेण ,एकमेकांची काळजी घेण हे सर्व निराळच असत .. अचानकपणे आयुष्यात हे नात येत आणि बघता बघता तेच नात कधी आयुष्य बनून जात हे कळतसुद्धा नाही 

हसुनी विसरावं
विसरुनी हसावं
अस तुझ माझ नात
न तू कधी विसरावं
न मी ते विसरू द्यावं  ...

मी तुला सावरावं
तू मला सावरावं
अस तुझ नि माझ नात
सावरुनी एकमेका
तुझ्या आनंदात हरवून जाव  ...

स्वप्नातली परी तू कि
परी च मला पडलेलं स्वप्न
अस तुझ नि माझ नात
ना माझ्याविना तुला
न तुझविन मला काही सुचावं ...

आयुष्यात तू आली माझ्या कि
माझ आयुष्य तुझ्यापर्यंत आलं
अस कस ग आपल हे नात
न ओळखूनसुद्धा एकमेका
वाटत आयुष्य एकत्र चं जगावं ...

अस हे एक नात ..दूर असूनही जवळ वाटणारं आणि जवळ असूनही अजून जवळ याव अस वाटणार .. अस हे एक नात .. तुझ नि माझ नात …

                                                                                                 - सुधीर