Tuesday, 10 March 2020

उच्च हे स्त्रीत्व ..


काल 9 मार्च होता .. 
म्हणजेच जागतिक महिला दिन .. 
काल दिवसभर सर्व वयातील सर्व स्तरातील स्त्रियांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता .. 
नेटवरून उधारीवर घेतलेले फोटो, काही छान अशा कविता पोस्ट करून वेगवेगळ्या माध्यमातून आपण कसे स्त्रीचा सन्मान करतो हे दाखवायची चढाओढ लागली होती .. वर्तमानपत्रांमध्ये ' स्त्री ' बद्दल भरपूर असे लेख वाचायला भेटले, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली काम करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान व त्यांच्या कहाण्या टीव्ही वर पाहायला भेटला... पण हे सर्व काल बघत असताना माझ्या मनात एक साधा प्रश्न आला .. 
खरच किती लोक , खासकरून किती पुरुष , मनात सुप्त पुरुषी अहंकार न आणता , आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्री ला योग्य तो सन्मान आणि वागणूक देतात ???? 
मुळातच,  आम्ही पुरुष उच्च आणि स्त्री ही पुरुषापेक्षा कमी, अशी समजूत असणाऱ्या पुरुषांची संख्या काढली तर थक्क होणारी आकडेवारी समोर येईल ..
किंबहुना , स्त्रियांमध्ये सुद्धा , आम्ही पुरुषांपेक्षा कमीच असतो अशी भावना असते, आणि ही भावना असते म्हणण्यापेक्षा या पुरुषप्रधान संस्कृती मध्ये ही भावना लहान वयापासून त्या मुलींमध्ये भरवली जाते , व नंतर ती त्या स्त्री मध्ये तशीच राहते आयुष्यभर ..
मग आपण का म्हणून शुभेच्छा देतोय स्त्रियांना ..
  1. एकांतामध्ये पत्नीला सन्मान आदर न देता , तिला मनात येतील त्या आई बापावरून शिव्या देणाऱ्या
  2. सासरी गेल्यावर माझे पाय तिकडच्या लोकांनी धुतले पाहिजेत असं म्हणून स्वतःला जावई अर्थात पुरुष म्हणून उच्च समजणाऱ्या जावयाला ,
  3. स्वतः घराबाहेर शंभर ठिकाणी तोंड मारून झाल्यावर सुद्धा पत्नीकडे घरी संशयाने बघणाऱ्या त्या माणसाला,
  4. मला मुलगी नकोय म्हणून स्वतःच्याच हाताने स्वतःच्या 1-2 महिन्यांच्या लेकीचा जीव घेणाऱ्या त्या त्या प्रत्येक पुरुषाला ,
  5. आणि त्याच्या या नकली पुरुषार्थ गाजवण्यात त्याला साथ देणाऱ्या त्या प्रत्येक स्त्रीला मला हेच म्हणायचे आहे की , का साजरा करायचा हा महिला दिंन ..
खर तर हे अख्खं आयुष्यच , एका आई च्या रूपातून एका स्त्री ने आपल्याला दिलं आहे , आणि आपल्याला अख्खं आयुष्य देणाऱ्या त्या स्त्री ला आपण काय देतो तर फक्त एका दिवसाचं कौतुक , एका दिवसाचं सन्मान , तो सुद्धा मनापासून न देता फक्त वरवरचा आणि खोटा खोटा ....
जर आयुष्यात उच्च अस काही करायचं असेल , तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवा.. मग बघा , तिच्याकडून एवढं प्रेम भेटेल की कशाचीच कमी नाही भासणार ..
प्रत्येक स्त्री , मग ती मुलगी असो वा पत्नी असो वा आई असो वा मैत्रीण असो , ती जन्मतः स्वतंत्र असते .. तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान करा .. 


आणि हो, स्त्री पुरुष समान आहे अस मी मुळीच मानत नाही .. स्त्री ही पुरुषापेक्षा काकणभर वरतीच असते , हेच सत्य आहे .....


              - सुधीर

Wednesday, 16 January 2019

आमच्या मनातलं थोडंसं ..



खरं तर वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणं ,गप्पा आणि चर्चा सुरूच असतात आमच्या एकमेकांसोबत ..
उत्तम श्रोती ,आणि कविमन समजून घेणारी ती आहेच .. पण बोलता बोलता एक दिवस अचानक असं समजलं कि चारोळ्या करणारं एक मन सुद्धा दडून बसलं आहे तिच्या मनात .. मग काय .. जमली आमची मेहफिल ..
त्यातलंच थोडंसं हे .. फक्त माझ्याच मनातलं थोडंसं नाही , तर आमच्या मनातलं हे थोडंसं ..

ती : सूर्याची सावली हि प्रत्येकाला दिसते , पण .. कुणी पाहिलीय का रात्रीतली त्या चंद्राची पडलेली सावली ...

मी : चंद्राच्या सावलीला एक वेगळीच किनार असते .. आजूबाजूच्या त्या अंधारात ती पण कुठेतरी हळूच दडून बसलेली असते ...

ती : दडून बसलेल्या सावलीला बघायला लागते फळत तिला प्रेमाने शोधणारी नजर ..

मी : अशी प्रेमाची नजर म्हणजे त्या रोहिणी नक्षत्राची देणी ..
       चंद्र नाही दिसला तरी त्याच्या सावलीला पाहून आनंदाने उजळून जाणारी ती रोहिणी ..
      स्वतःच्या प्रकाशात त्या चंद्राच्या दडून बसलेल्या सावलीला उजेडात आणणारी ती रोहिणी ..



                                                                            - सुधीर & कोमल




Thursday, 6 December 2018

हि पाऊलवाट ..



हि पाऊलवाट .. 
तुझ्या आणि माझ्या आयुष्याची हि पाऊलवाट .. 
अनेक वळणावळणांमधून ,कधी वेड्यावाकड्या तर कधी सरळ अशा या वाटेवर सुरु असलेला आपला हा आत्तापर्यंतचा स्वतंत्र असा हा प्रवास ,हि आपली पाऊलवाट ,आता यापुढे एक होईल .. 
आत्तापर्यंत या वाटेवर चालताना उमटत जाणाऱ्या माझ्या एकाकी अशा या पाऊलखुणांना ,यापुढे कायमची साथ मिळेल ती तुझ्या उमटणाऱ्या पाऊलखुणांची ..
आत्तापर्यंतचा हा आपला प्रवास ,हि आपली पाऊलवाट वेगळी अशी होती .. 
तुझा प्रवास तुझ्या वाटेवरती आणि माझा प्रवास माझ्या वाटेवरती सुरु होता ..
या वाटेवर चालताना ,
कधी सुखाच्या शीतल थंडगार अशा सावलीतून चालावं लागलं तर कधी चालता चालता भेटला तो दुःखाचा गडद असा भयाण अंधार .. 
कधी अक्षरशः अस्तित्व हादरवून टाकणार असं एखाद भयानक वळण लागलं तर कधी या मनाला आनंदाच्या चिंब पावसात भिजवून टाकणारं असं वातावरण दिसलं .. 
असंख्य झाडांनी ,असंख्य फुलांनी या प्रवासात आपली साथ दिली ,काही त्या-त्या वेळेला साथ देऊन नंतर वेगळ्या वाटेने निघून गेले तर काही वाटसरू अजुनसुद्धा आपल्यासोबत या वाटेवरचे वाटसरू बनून साथ देत आहेत .. 
या वाटेवर लागणाऱ्या प्रत्येक वळणावर ,तुला आणि मला घ्यावा लागला तो एक निर्णय ,तो हा कि पुढे नेमकं कोणत्या दिशेने जायचं .. 
निर्णय घेताना कधी-कधी पाऊल डगमगल सुद्धा ,कारण प्रत्येक वळण आयुष्याला कुठेतरी घेऊन जाणारं होत हे माहीत होत ,आणि मग भीतीसुद्धा वाटायची ,चुकीचा निर्णय घेऊन चुकीच्या वळणाने गेलो तर ... 
ते निर्णय कधी कधी बरोबर निघाले तर कधी ते साफ चुकलेसुद्धा .. 
पण खरं तर ,बरोबर असो वा चूक ,पण आपण घेतलेल्या त्याच वळणांमुळे ,त्याच निर्णयांमुळे कदाचित आपली हि वेगळी-वेगळी चालणारी पाऊलवाट ,पुढे जाऊन एका सुंदर अशा क्षणी ,एका नकळत अशा वळणावर येऊन एक झाली .. 
आणि म्हणूनच त्या प्रत्येक झाडाला ,प्रत्येक फुलाला ,प्रत्येक उजेडाला आणि प्रत्येक अंधाराला ,प्रत्येक पावसाला आणि अशा त्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अशा वळणांना ,ज्यांनी आपली हि पाऊलवाट एक करायला ,आपल्याला एक व्हायला कळत-नकळत मदतच केली ,त्या सर्वांना मनापासून धन्यवाद .. 
आणि या पाऊलवाटेवर आपल्या पुढच्या प्रवासासाठी तुला-मला खूप प्रेमळ अशा शुभेच्छा ..



                                                                       - सुधीर 

Sunday, 8 July 2018

नातं ..



नातं .. 
मग ते नातं कुठलंही असो .. 
ते हळुवारपणे खुलण्यातच खरी मजा असते ..
पण आजकाल सर्वांनाच घाई झाली आहे .. सर्व गोष्टींची घाई .. 
नातं पटकन तयार व्हावं आणि या पटकन तयार झालेल्या नात्याची वीण मात्र आयुष्यभर टिकावी अशीच अपेक्षा करतात अन इथेच फसतात हि मंडळी ..  
जस प्रत्येक कळी तिच्या कलेकलेने खुलते ,जस प्रत्येक झाड त्याच्या कलेकलेने वाढत ,तसंच या नात्यानासुद्धा कलेकलेने खुलू द्यायचं असत ..
मग असंच खुलता खुलता पुढे जाऊन त्या नात्यात एक घट्ट आणि कधीच न तुटणार बंध तयार होतो , जो कायम राहतो, चिरकाल टिकतो .. 
त्यासाठी पाहिलं ते नातं जुळेल .. मग ते त्याच्या कलेने खुलायला लागेल .. आणि मग त्या नात्याची सुंदर अशी कळी खुलेल .. 
पण त्या नात्याला असं खुलण्यासाठी योग्य वेळ नाही दिला तर ते नातं चिरकाल टिकेलच याची शाश्वती नाही  .. 
म्हणून सावकाशपणे जुळू द्या या नात्यांना .. 
हळुवार असं खुलू द्या या कळीला ..
त्यानंतरच खरं हि कळी जोमाने खुलेल .. 
अन आयुष्यात आनंदाचा , प्रेमाचं सुगंध पसरेल .. 



                                                                                         - सुधीर 

Sunday, 10 June 2018

व्यक्त-अव्यक्त ..

                 

               
कधी कधी मला कुतुहूल वाटतं की नेमकं कोण कोणाला व्यक्त करतंय इथे .. मी या शब्दांना व्यक्त करतोय कि हे शब्द मला व्यक्त करत आहेत ..
  खरं तर मन आणि शब्द यांचं नातं व्यक्त-अव्यक्त असं असत .. जेव्हा एक अव्यक्त असतो तेव्हा दुसरा त्याला आपोआप व्यक्त करतो .. जणू काही दोन खूप जवळचे मित्र ,ज्यात एक रागावून रुसून बसला तर लगेच दुसरा त्याला बोलत करायचा प्रयत्न करतो  .. मन आणि शब्दांचं असंच तर आहे अगदी .. मनाविरुद्ध काही घडलं कि हे मन मग स्वतःशीच रुसून बसतं , तेव्हा मग या शब्दांनीच या मनाची मनातल्या मनात समजूत काढावी लागते .. आणि जेव्हा कधी हे शब्दच रुसून बसतात तेव्हा हे मनच स्वतःला आतल्या आत व्यक्त करत राहत .. तेव्हा ओठांवर शब्द जरी येत नसले तरी मनातल्या मनात मात्र विचारांचा अन शब्दांचा भडीमार सुरु असतो ..
  म्हणूनच कधी वाटत कि माझं मनच अव्यक्त आहे आणि हे शब्द त्या मनाला व्यक्त करतात , तर कधी वाटत कि हे शब्दच अव्यक्त आहेत ज्यांना व्यक्त करायचं काम या मनात सतत सुरु असत ..
असा हा खेळ मनाचा आणि या शब्दांचा ..
व्यक्त-अव्यक्त असा हा खेळ ..


                                                                                  - सुधीर     

Sunday, 25 March 2018

स्पर्श तुझा ...



तळहात तुझा टेकव 
माझ्या या हातांवर 
पाऊससुद्धा पडेल मग 
    त्या तहानलेल्या फुलांवर  .. 

ओल्या स्पर्शाने तुझ्या 
उजळेल अशी ती रात्र 
आपल्या प्रेमाच्या वर्षावात 
न्हाऊन निघेल ती रात्र .. 

हे आभाळ फाडून चंद्र
सुद्धा येईल साक्षीला 
अन स्पर्श तुझा नि माझा 
     लाजवेल त्या रात्रीला ..  


                                                              - सुधीर 

Monday, 5 February 2018

तुझ्या नसण्यातलं तुझं असणं .....


समुद्रकिनाऱ्यावर बसून बराच वेळ दोघेपण शांतपणे त्या समुद्राला पाहत होते .. तेवढ्यात त्याच्याकडे पाहून 
ती म्हणाली " तुला कधी कळालं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ते ?"
तो "हे बघ  ,खरं पाहायचं  तर याने काही फरक पडतो का , कधी कुठे  कसं या प्रश्नांना काही अर्थ नाही आता .बस आवडतेस तू मला आणि आहे माझं तुझ्यावर प्रेम ."
ती " नाही तू सांगच मला ,मला माहित आहे सरळ सोप्प उत्तर नाहीच देणार तू . नेहमीसारखं शब्दांच्या गोल-गोल जाळ्यात काहीतरी अवघड असं उत्तर देणार तू मला .. तरीपण मला हवंय उत्तर .. सांग ."
तो "मग एक तर माझं उत्तर . तू माझ्या आयुष्यात यायच्या आधीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ."
ती "ए काहीपण सांगू नकोस .. असं कस शक्य आहे ."
तो "खरंच .. तू भेटण्याच्या आधी मी तुलाच तर शोधत होतो .. तू कुठे होती ,तुझं नाव काय होतं ,तू कशी दिसायची ,कशी हसायची ,कशी बोलायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कशी रुसायची ,हे मला नव्हतं माहीत .. पण हो , तुझ्या माझ्या आयुष्यात 'नसण्यामध्ये ' मला कुठेतरी तुझं ' असणं ' जाणवलं होत .. सारखं जाणवायचं माझ्या मनाला की तू आहेस कुठेतरी ,जवळ की दूर ते नव्हतं माहित पण आहेस कुठेतरी एवढं नक्की जाणवतं होत .. मी फक्त वाट पाहत होतो तू माझ्या आयुष्यात येण्याची ..
दिसणाऱ्या अनेक चेहऱ्यांमध्ये मला तुझा भास व्हायचा .. असं वाटायचं की ,हीच तर नाही ना  ती .. हो नंतर निराशा व्हायची कारण ती तू नसायची .. पण तू भेटशील एक दिवस हि आशा नव्हती सोडली .. माझ्या मनाला आपली वाटेल अशी ती साउली नक्की भेटणार असं सारखं वाटत राहायचं .. 
माझा हा कळत-नकळत तुझ्या दिशेने सुरु असलेला प्रवास ,या तुझा शोध घेण्याच्या प्रवासातच मी तुला न पाहताच तुझ्या या दिसण्याच्या ,या हसण्याच्या ,या बोलण्याच्या प्रेमात पडत गेलो .. आणि ते प्रेम आजही आहे .."
एवढं सांगून त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती .. 
तेव्हा हलकंसं हसून तो म्हणाला " अवघड आहे ना समजायला .. हे असं आहे बघ माझ्या मनाचं ..समजायला थोडंसं अवघड पण थोड साधं सरळ आणि सोप्प सुद्धा आहे बरं .."
ती अजुन पण काहीच न बोलता त्याच्याकडे फक्त पाहत होती .. 
तेव्हा त्याने विचारलं " मग मॅडम ,भेटलं का तुम्हाला तुमचं उत्तर .."
त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली " भेटलं तर नाही  .. पण मला समजलं .. तुझं उत्तर आणि तुझं मन सुद्धा " 
त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन ती पुन्हा शांतपणे त्या मावळतीच्या रंगात मावळत जाणाऱ्या समुद्राकडे ,आणि त्या अंधुक होत जाणाऱ्या क्षितिजाकडे पाहत बसली .. ... 




                                                                                       - सुधीर 

Friday, 29 December 2017

योगायोग ..



योगायोग .. 
बऱ्याच वेळा घडून येतात हे आपल्यासोबत .. 
हे तस अचानकचं घडतात पण जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा मनाला आनंद मात्र नक्कीच मिळवून देतात . 
नीट आठवून बघा ,तुमच्या आयुष्यात ज्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आल्या ,त्यांचं तुम्हाला भेटणं हे कुठल्यातरी योगायोगामुळेच शक्य झालं होत ..  
कदाचित तुम्हाला मिळालेलं प्रेम ,अथवा भेटलेले खूप जवळचे मित्र आणि त्यांच्यासोबतची आयुष्यभराची जडलेली मैत्री अथवा नकळतच सापडलेली तुमची आवड,तो तुमचा स्वतःचा असा छंद . हे सर्व त्या त्या वेळेला घडलेल्या त्या त्या योगायोगांमुळेच शक्य झालं होतं .. आता आपण जेव्हा ते योगायोगाचे क्षण आठवतो तेव्हा मनात हा विचार नक्कीच येतो कि तेव्हा ते तस घडलं म्हणूनच कदाचित आज माझं आयुष्य हे असं आहे .. 
खरं तर म्हणायला म्हणतो आपण या गोष्टींना 'योगायोग' म्हणजेच अचानकपणे अनाहूतपणे घडणाऱ्या अशा गोष्टी. आपल्याला असं वाटत कि अरे हे अचानकपणे कस काय घडलं ..  
पण खरंच हे योगायोग ,या गोष्टी एकदम अचानकपणे घडलेल्या असतात का ?
पश्चिमेकडे एक वाक्य प्रसिद्ध आहे कि दूर कुठेतरी ,योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी ,एक इवलंसं असं फुलपाखरू जेव्हा त्याचे पंख फडफडवतो तेव्हा त्या इवल्याशा पंखानी त्या हवेच्या एकदम थोडस हलकंसं असं हलण्याने एक घटनांची अशी साखळी तयार होते जी दूर कुठेतरी येणाऱ्या एखाद्या मोठ्या वादळाची सुरुवात ठरते ..
मग आपल्या आयुष्यात येणारे किंवा घडणारे ते अनाहूत असे योगायोग ,ते घडून यायला म्हणून घटनांची एक साखळी खूप आधीच सुरु झालेली असते का ?
का या गोष्टी खरंच अचानक अनाहूतपणे एकदम घडून येतात ?
या प्रश्नाचं उत्तर भेटणं तस अवघड आहे .. ते उत्तर त्या वर बसलेल्यालाच माहित असेल कदाचित ,पण तो बोलत नाही हि एक वेगळीच समस्या ..
पण एक नक्की ,मनाला माहित नसत कि पुढे काय होणारे आणि अशा वेळी जेव्हा अनाहूतपणे एखादा योगायोग घडून येतो कि तो मनाला एक वेगळाच आनंद मिळवून देतो . 
मग नकोच याबद्दल जास्त विचार करायला . 
सध्या तरी फक्त हे योगायोग आणि त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या या आयुष्यातल्या गोष्टी ,यांना मनापासून जगूया ..... 




                                                                                                    - सुधीर 

Sunday, 1 October 2017

शोधता तुला ..


एकाच वेळी तू आयुष्यात येशील याची वाटसुद्धा पाहणं ,आणि त्याच वेळी या जगातल्या चेहऱ्यांच्या गर्दीमध्ये तुला शोधणं  हे सोप्प नाहीय .. 
शोधता शोधता तुला 
माझा मीच कसा हरवलो .. 
कधी या वाटेवर 
तर कधी त्या वळणावर 
मी एकटाच घुटमळलो .. 
प्रत्येक क्षणाला का असं सारखं जाणवत कि तू आहेस कुठेतरी ,माझ्या आयुष्यात नसूनही तू आहेस आणि तुझं ते असणं जाणवतं मला आणि माझ्या मनाला क्षणाक्षणाला .. 
आहेस तू कुठेतरी 
हे माझं मन जाणत .. 
कदाचित 
या मनाला माझ्या 
तुझं हे असं जाणवतं .. 
माहित नाही कधी भेट होईल आपली ,पण एवढं नक्की माहित आहे कि भेट होईल कधीतरी कुठेतरी .. कुठल्यातरी वळणावर वा आयुष्याच्या या वाटेवर नक्की भेटशील तू मला .. आणि माझ्या पावलांसोबत जोडली जातील तुझी पाउलें ..  
भेटतील कधीतरी कुठेतरी 
आपल्या पावलांची वाट 
होईल पुढचा रस्ताही एक 
आणि सरेल हि आयुष्याची वाट .. 



                                                                            - सुधीर 

Saturday, 19 August 2017

माझ्यातला 'मी' ..


माझ्यातला 'मी' .. 
सर्वांना बाहेरून सहसा न दिसणारा पण सतत बाहेर यायची धडपड करणारा तो माझ्यातला 'मी' .. 
माझ्यातला 'मी'  जो बाकीच्या जगापेक्षा आहे वेगळा ,आणि याच वेगळेपणामुळे तो मला खऱ्या अर्थाने 'मी' बनवतो ,मला मीपण देतो .. 
हा माझ्यातला 'मी'च आहे ज्यामुळे तुम्ही सर्व 'इतर' होता आणि मी होतो तुम्हा इतरांपेक्षा असा वेगळा .. 
माझ्यातला असा हा 'मी' अजूनही आहे माझ्या सोबत ,आयुष्यातला प्रत्येक क्षण जगताना तो मला भेटत असतो ,त्याचे अन माझ्या मनाचे संवाद हे तर सतत सुरूच असतात .. 
तो 'मी' माझ्याबरोबरच कधी हसतो तर कधी माझ्यावरच रुसतो ,काही आवडलं कि हट्ट करतो आणि काही नाही मिळालं कि हिरमुसून गुपचूप बसतो .. काही चांगलं झालं तर माझ्यासोबत आनंदी होणारा ,आणि काही दुःख झालं तर मन भरून आणून रडणारा सुद्धा तोच आहे ,माझ्यातला 'मी'  ..
माझ्याशी मनातल्या मनात भांडण करणारा तोच आहे ,आणि वेळोवेळो माझ्या मनाची समजूत काढणारा सुद्धा तोच आहे ,माझ्यातला 'मी' ..  
असा हा माझ्यातला 'मी' आहे अजूनही माझ्याच जवळ  .. 
पण तुमच्यातला तो 'मी' आहे का तुमच्याजवळ .. एकदा विचार करा ..  
मी हे काय करतोय ,कसं जगतोय ,खरच असच जगायचं आहे मला कि इच्छा नसताना समाजाच्या भीतीने असं जगावं लागतंय ,हा असा विचार जर दिवसातून एक क्षण जरी येत असेल तुमच्या मनात तर हरवला आहे तुमच्यातला तुमचा 'मी' .. 
जगाला दाखवायला म्हणून मला हे आवडत ,मला ते आवडत असं खोटं सांगताना मनातून खरच काय काय आवडत हे जर तुम्हाला लपवावं लागत असेल तर हरवला आहे तुमच्यातला तुमचा  'मी' .. 
आयुष्यातल्या सुंदर क्षणांना मनामध्ये आणि डोळ्यामध्ये न साठवता ते क्षण फक्त एखाद्या फोटोमध्ये साठवून तुम्हाला खोटा खोटा आनंद भेटत असेल तर हरवला आहे तुमच्यातला तो तुमचा 'मी' .. 
लोक काय म्हणतील या भीतीने तुमच्यातल्या खऱ्या 'मी'ला जर मनात कोंडून ठेवावं लागत असेल तुम्हाला तर हरवला आहे तुमच्यातला तो तुमचा 'मी' .. 
मग विचार करा ,खरचं आहे का तुमच्यातला 'मी' तुमच्या जवळ .. 
नसेल जवळ तर शोधा त्याला ,आहे तो कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेला .. 
त्याला सोबतीला घेऊन आयुष्य आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण जगून तरी बघा .. कदाचित एक वेगळंच आयुष्य ,एक वेगळंच जग येईल तुमच्या वाट्याला .. 
कदाचित गवसेल तुम्हाला तुमच्यातला खरा 'मी' आणि गवसेल त्या 'मी'मध्ये दडलेलं तुमचं मीपण .. 
एकदा विचार करून बघा ...  
                                                माझ्यातला तो 'मी' अन 
                                                'मी' मधलं ते माझंपण ... 
                                                शेवटी आयुष्य म्हणजे हेच आहे 
                                                माझं अस्तित्व शोधण्याची 
                                                माझं मीपण गवसण्याची 
                                                चाललेली अविरत अशी वणवण ... 


                                                                                                                                                                                                             - सुधीर 
                                                                                       




Wednesday, 19 July 2017

माझ्या मनाचा सागर ...


आज दूर अशा एका किनाऱ्यावर बसून मी पाहतोय माझ्या मनाच्या त्या सागराला .. 
तो माझ्या मनाचा सागर ,तो माझ्या मनाचा समुद्र खूप उद्विग्न आहे ,आणि खवळलेलासुद्धा आहे .. 
वादळापाठोपाठ दुसरे वादळ ,अशी कित्येक वादळे त्याने सहन केलीत ,आणि अजूनही तो अशीच वादळे सहन करतोय .. 
पण खरं तर वरून दिसायला तो कितीही खवळलेला दिसत असला ,तरी आतमध्ये एकदम खोलवर तो मात्र कमालीचा शांत आहे .. 
स्वतःच्या खोलीच्या ,स्वतःच्या अंतःकरणाच्या आणि स्वतःच्या शोधात तो मग्न आहे .. 
असा हा माझ्या मनाचा सागर  .. कोणालाही न दिसणारा ,आणि सहसा कोणालाही न समजणारा ... 


                                                                                        - सुधीर 

Wednesday, 21 June 2017

तिचा देव ..


ती " आज आपण पूजेला गेलो होतो ,पण काय रे तुझं पूजेत लक्षच नव्हतं अजिबात .. "
थोडासा खट्याळ चेहरा करून तो " पूजा , कोण पूजा .. "
थोडस रागावून ती म्हणाली "हेच धंदे करा तुम्ही ,म्हणजे ऐकेल देव तुझं गाऱ्हाणं चांगलच ."
     तो "पण देव गाऱ्हाणे ऐकवायला थोडीच असतो .. मला सांग आपल्या आयुष्यात जे काही घडत ते त्या देवाच्याच इच्छेने ,मग त्याच्याच इच्छेने घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्याच्याचकडे गाऱ्हाणे करायचं हे जरा विरोधाभास नाही का वाटत तुला .. आणि तसही देव तर आपल्या आतच आहे मग बाहेर कोणाकडे अन कशाला गाऱ्हाणे करायचं .."
     ती " मग तूच सांग ना ,देव काय आहे ,का आणि कोणाला मानतो देव आपण ,जर देव आपल्या आतच आहे तर मग बाहेर काय शोधतो आपण .."
      तो " सोप्प्या शब्दात सांगू का देव कोण आहे .. देव म्हणजेच मी आणि मी म्हणजेच देव ,देव म्हणजेच तू आणि तू म्हणजेच देव .. "
ती थोडं आश्चर्याने बघत काहीच न कळाल्याचे भाव घेऊन त्याच्याकडे बघत राहिली .. 
      तो " हे बघ ,देव तुझ्या माझ्या आतच आहे .. त्या आतल्या देवाला शोध ,तो आतला आवाज म्हणजेच तुझ्यातल्या त्या देवाचा आवाज आहे .. खरं तर लोक बाहेर शोधतात देवाला ,पण विचार केला तर किती जणांना देव भेटतो सांग बर  . ज्या लोकांना देव सापडला ,ते विवेकानंद किंवा ज्ञानेश्वर अथवा तुकाराम हे सर्व लोक ,यांनी आधी स्वतःला शोधलं ,स्वतःच्या आतला त्या आवाजाला ऐकलं .. म्हणजेच असं कि आधी त्यांनी स्वतःच्या आतला देव शोधला आणि मग या समाजाला दाखवून द्यायचा प्रयत्न केला कि देव काय आहे .. " 
ती "पटतंय तुझं म्हणणं मला .. पण काय रे मंदिरात सुद्धा कधी कधीच जाणारा तू , मग देवाबद्दल एवढा विचार तू कसा काय केला ?"
     तो " कारण तुझं हृदय आणि त्यात बसलेला तुझा देव .. तुझ्या या हृदयाचं आणि त्या देवाचं नातं एवढं घट्ट आहे कि तुम्हा दोघांना वेगळं करण शक्यच नाही .. म्हणूनच खर तर तुझ्या हृदयापर्यंत पोहोचायच असेल तर मला त्या देवापर्यंत पोहोचावं लागेल आधी ... "
हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हलकस हसणं ,कदाचित त्यालासुद्धा त्याच्या देवाची एक झलक दाखवून गेलं असेल  ..  


                                                                                            - सुधीर





Sunday, 7 May 2017

मन आणि मनाचा गोंधळ ....


ती त्याच्याकडे पाहत म्हणाली 
"तुला कसं जमत रे हे . कसं काय एवढा शांत असतोस तू . नेहमी एवढा शांत ,एवढा स्थिर कसा काय राहू शकतोस तू . तुझ्याकडे पाहिलं , तुझ्याशी बोललं कि असं वाटत हो माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मला नक्कीच मिळतील . तुझ्यासोबत नुसतं बोललं तरी एक वेगळीच शांतता जाणवते मनाला . मला तर ना तू एखाद्या शांत झऱ्यासारखा वाटतोस . एक शांत थंड पाण्याचा झरा , अजिबात आवाज न करणारा तरीपण स्वतःचाच एक वेगळा असा आवाज असणारा ,वरून दिसायला खूप शांत तितकाच आतून खूप खोल सुद्धा .. "
थोडस वैतागलेली ,पण शांत रहायचा प्रयत्न करणारी ती .. तिच्याकडे कौतुकाने पाहत होता तो .. 
ती पुढे म्हणाली 
"कधी कधी ना खूप कंटाळा येतो या सतत मनात येणाऱ्या विचारांचा ,माझं मन शांत राहतंच नाही कधी .. सतत प्रत्येक क्षणी मनात कुठलातरी विचार सुरूच असतो ,आणि त्या उमटणाऱ्या प्रत्येक विचारात एकतर मी गुंतून तरी जाते किंवा हा विचार का आला याचाच विचार करत बसते .. कधी भूतकाळात तर कधी भविष्यात ,हे मन सतत इकडून तिकडे हेलकावे खात असत .. कधी आयुष्याच्या समस्यांचा पाढा तर कधी लोकांच्या चुकीच्या वागण्याचा त्रागा सुरु असतो या मनात .. कधी होणार हे मन शांत माझं ,कधी थांबणार हे विचार काहीच समजत नाही .."
तिची उद्विग्नता पाहून तो म्हणाला 
"अग थांब ,थोडं थांब ,एवढा त्रास करून नको घेऊ स्वतःला . एक काम कर ,एक क्षण मोकळा श्वास घे आता आणि मी काय सांगतो ते शांतपणे ऎक .. 
तिला समजलं कि आता तिच्या या प्रश्नच उत्तर तिला मिळणार ,म्हणून तिच्या गालावर हलकस हसू आलं आणि तिने खरच एक मोकळा श्वास घेतला आणि त्याच्याकडं पाहून म्हणाली " सांग आता .. "
तो म्हणाला 
"का अडवतेस या विचारांना ,का येणाऱ्या प्रत्येक विचारामध्ये एवढं गुंततेस तू ? "
"मी जरी तुला झऱ्यासारखा वाटत असलो तरी तू मात्र समुद्र आहेस ,एक अथांग अशा मनाचा समुद .. फक्त तुला त्याची जाणीव नाही अजून .. आतमध्ये कितीही मोठं ,कितीही भयंकर असं वादळ उठलं तरी कमालीचा शांत राहायची क्षमता असते समुद्रामध्ये .. कारण त्याला त्याच्या खोलपणाचा अंदाज असतो .. म्हणूनच तो उठणाऱ्या सर्व वादळांना तटस्थपणे सामावून घेत असतो स्वतःमध्ये .. तो त्या वादळांमध्ये गुंतून न जाता त्यांना हवं तस मुक्त खेळू देतो आणि म्हणूनच तो बाहेरून एवढा शांत स्थिर राहू शकतो .. "
     "तुझं मन सुद्धा खूप खोल आहे .अगदी त्या समुद्रासारखं .. बस मनात येणाऱ्या विचारांना अडवण्याचा प्रयत्न नकोस करू .. तू स्वतः मनात उमटणाऱ्या विचारांमध्ये न गुंतत त्यांच्याकडे तटस्थ नजरेतून पहा .. चांगला काही विचार आला तर त्याच कौतुक कर ,वाईट काही असं आल मनात तर त्याला रागाव ,त्याच्यासोबत हसायचं सुद्धा ,खेळायचं सुद्धा आणि कधी कधी रडायचं सुद्धा ,पण थोडाच वेळ .. पुन्हा बाहेर यायचं आणि व्हायचं .. त्या विचारांना तुझ्या मनामध्ये जसं खेळायचं तस इकडून-तिकडून खेळू दे .. त्यांना जस वहायचं तस वाहू दे .. अगदी मुक्त संचार करू दे त्या विचारांना .. "
     " मग बघ ,खेळून खेळून थकलेलं एखाद लहान बाळ जस थकून जाऊन शांतपणे झोपत अगदी तसंच तुझ्या मनातले विचार सुद्धा स्थिर होऊन ,शेवटी शांत होईल तुझं मन  .."  



                                                                                - सुधीर 





Saturday, 18 February 2017

तो दिवस ...


दिवस .. 
खरंच आयुष्यात चांगले दिवस किती आणि वाईट जाणारे दिवस किती येतात हे मी सांगायची गरज नाही .. 
आपण सर्वजण हे दिवस अनुभवत असतोच ..  
पण कधी कधी ना काही काही दिवस हे खरंच खूप वाईट जातात .. 
एखादी भयाण काळीकुट्ट अंधाराची रात्र असावी आणि त्यात भर म्हणून एकदम भयानक असं स्वप्न पडावं असे काही दिवस सर्वांच्या आयुष्यात नक्कीच येतात आणि नंतर काही काळाने निघून सुद्धा जातात .. 
पण 
या वाईट जाणाऱ्या दिवसांमध्ये तो एक चांगला गेलेला दिवस सुद्धा असतो .. 
खरं तर काहीतरी मनासारखं घडलेला ,किंवा काहीतरी अनपेक्षित असं घडून या मनाला अतिशय आनंद देऊन गेलेला तो दिवस असतो .. 
त्या दिवसाला मनाच्या एका कप्यात एकदम जपून ठेवा ,त्याची काळजी घ्या .. 
कितीही निराशेचे मळभ साचले या मनावर तरी त्या दिवसाच्या आठवणींना झाकून जाऊ देऊ नका .. 
कारण या संघर्षाच्या दिवसांमध्ये आणि भयाण स्वप्नांच्या रात्रीत ,तो दिवस ,त्या दिवसाच्या त्या चांगल्या आठवणी ,ते आनंदाचे क्षण याचाच खूप मोठा आधार मिळत असतो या मनाला .. 
तेव्हा नक्की जपून ठेवा त्या आठवणी , तो दिवस ... 


                                                                                                     - सुधीर

Sunday, 8 January 2017

जाणिवेचा एकटेपणा ...


गच्चीवर कठड्याला हात टेकवून दोघे निवांत उभे होते .. 
पण ती आज कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती .. 
हे जाणवताच त्याने विचारलं "काय झालं ? कसला विचार करत आहेस ?" .. 
ती "मला ना आज खूप एकटं-एकटं वाटत आहे ,का कुणास ठाऊक पण सर्व आपली अशी माणसं जवळ असून सुद्धा मला त्यांच्यात असल्यासारखं वाटत नाहीये .. एक वेगळाच एकांतपणा जाणवतोय मनात ,असं वाटत कि कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन नुसतं बसावं ,तासनतास फक्त बसून राहावं " .. 
तो "मला सुद्धा कधी कधी असंच वाटत .. किंबहुना मला तर वाटत की आपल्यालाच नाही तर सर्वांनाच कधी ना कधी हे असं नक्कीच वाटत असणार ,गर्दीमध्ये असूनसुद्धा हा एकटेपणा नक्कीच जाणवत असणार " .. 
ती "बाकीच्यांचं नाही माहित पण मला नाही आवडत रे हा नसलेला पण तरीही जाणवणारा एकटेपणा .. कधी भविष्यात मी खरंच एकटी पडली तर मग काय करू .. आत्ता फक्त जाणवणारा हा एकटेपणा एक दिवस खरंच माझ्या वाट्याला आला तर कस करू ?मला तर काळजीच वाटते " .. 
तिचं हे बोलणं ऐकताना तो काहीच नाही बोलता फक्त समोर दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत होता  .. 
शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं "तू काय करतोस रे असं एकटं एकटं वाटायला लागल्यावर ?? "
त्याने तिच्याकडं पाहिलं तर तिचा चेहरा एकदम चिंतातुर झाला होता .. 
तेव्हा तो गालातल्या गालात थोडंसं हसला आणि म्हणाला 
"एक काम कर .. ते समोर पसरलेलं क्षितिज पहा ,अगदी जिथपर्यंत तुझी आणि माझी नजर पोहोचते तिथपर्यंत पसरलेल ते क्षितिज .. एकाच वेळेला आभासी पण तरीही तितकच खरं आणि शाश्वत .. आणि असं उदाहरण दुसरं नाही सापडणार ,जे एकाच वेळी आभासी पण आहे आणि तितकंच खरं सुद्धा .. आभासी ,कधीही हाताला न येणारं .. जेवढं त्याच्या मागे जाशील तेवढं ते आणखीन पुढे पुढे सरकत जाणारं " .. 
"पण असं आभासी असूनसुद्धा ते शाश्वत असत आपल्या आयुष्यात .. तुझ्या-माझ्या आधीसुद्धा त्याच अस्तित्व होत ,आज आपण आहोत आणि तोसुद्धा आहेच आपल्यासोबत ,आणि आपल्यानंतरही त्याच अस्तित्व असेलच .. म्हणून कधीही एकटं-एकटं वाटलं ना कि मी या क्षितिजाकडे पाहतो .. तो असतो कायम इथे ,नेहमी माझ्या सोबत .. मी कुठेही गेलो तरी हा तिथे असतोच , मला कधीही एकटा पडू देत नाही हा .. आता इथे गच्चीवर सुद्धा आहे तो ,कधी एकट्याने प्रवास करताना खिडकीतून बाहेर पहिलं की हमखास दिसतोच तो ,कधी कधी निराशेने भरलेल्या एकट्या अशा काळोखाच्या रात्री खिडकीमध्ये येऊन पहिलं तरीसुद्धा तो असतोच तिथे ,जेव्हा जेव्हा एकटं-एकटं वाटलं तेव्हा तेव्हा तो सोबत होता आणि यापुढे सुद्धा असेलच " .. 
त्याच बोलणं ऐकण्यात हरवलेली ती नकळत त्या समोर दिसणाऱ्या क्षितिजाकडे पाहण्यात कधी गुंग झाली तिलासुद्धा नाही कळालं .. 

                                                                                                   - सुधीर


Thursday, 8 December 2016

एका प्रेमाची गोष्ट ..


ती "आज तू एवढा शांत शांत का आहेस ? काही झालंय का ?"
तो "तुला एक सांगू का ?"
ती "सांग ना ,त्यात विचारायचं काय "
तो "मला आजकाल भीती वाटते खूप तुझ्यासोबत बोलायची ."
     "कारण ,जेव्हा तुझ्याशी बोलतो ना तेव्हा असं कधीच होत नाही कि माझ्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरु आहेत ,आणि फक्त माझे ओठ हालत आहेत ,किंवा काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत असतो असं सुद्धा नाही .. खरं तर तुझ्याशी बोलताना मी नसतोच बोलत ,बोलत असत ते माझं मन .. आणि हे मन इतक्या आवेगानं ,इतक्या इच्छाशक्तीनं सर्व मनातले शब्द ,सर्व भावना बाहेर पाठवत असत कि या ओठांनाही शक्य होत नाही त्यांना थांबवणं ."
    "आणि मी या आधी कोणासमोरही जेव्हा जेव्हा माझं मन असं मोकळं तेव्हा तेव्हा समोरच्या व्यक्तीने या मनाची किंमत नाही केली .. म्हणून भीती वाटते तुझ्यासमोर मन मोकळं करायची ."
त्याच हे बोलणं ऐकून ती फक्त हलकंसं गालातल्या गालात हसली .काही क्षण ते दोघेही काहीच न बोलता फक्त समोरचा तो मावळणारा सूर्य पाहत उभे राहिले .. काही वेळाने तिने त्याचा हात हातात घेतला ,आणि पुन्हा ती त्या सूर्याकडे ,त्याच्या बदलत जाणाऱ्या मावळतीच्या रंगाकडे पाहत तशीच उभी राहिली ..
त्याला जाणवलं कि तिने त्याचा हात खूप घट्ट पकडून ठेवला आहे .. तिला काय म्हणायचंय हे त्याला समजलं .. आणि याच निःशब्द शांततेत ,समोर क्षणाक्षणाला मावळत जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने एक प्रेमाची ,एका विश्वासाची गोष्ट कदाचित सुरु झाली .... 



                                                                                              - सुधीर


Sunday, 25 September 2016

तेव्हा आणि तिथूनच ...



                   हो ,जेव्हा कोणीतरी एकदम जवळच असं दूर जातं ,तेव्हा मनाला त्रास तर होतोच .. पण खरं तर यांच्यानंतरच इतके दिवस समोर असूनही दिसत नसलेलं असं ते सत्य आपल्याला दिसायला लागत .. सत्य स्वतःबद्दलच .. आणि तिथूनच खरी सुरुवात होते शोधाची .. शोध सुरु होतो स्वतःचा .. म्हणूनच असं म्हणता येईल की ,गवसल्यानंतर कोणीतरी हरवलं जरी तरी त्या हरवण्यातूनसुद्धा काहीतरी गवसतंच ,नाही का  ...  
जेव्हा आयुष्यातून कुणीतरी 
एकदम जवळचं हरवत ना ,
तेव्हा आणि तिथूनच 
स्वतःचा खरा शोध सुरु होतो ... 

                                                                                                                                 - सुधीर

Sunday, 18 September 2016

कधीच नाही ...


नाही .. 
मी नाही विचारलं तिला .. कारण इच्छाच झाली नाही विचारायची .. 
मी नाही विचारलं तिला तिचं पूर्ण नाव .. कारण पूर्ण नाव म्हटलं कि आडनाव सुद्धा त्यात आलंच .. आणि मला खरंच नाही जाणून घ्यायचं तीच आडनावं .. 
कारण आडनाव म्हटलं कि त्यात लपून-छपून 'जात' सुद्धा येतेच ,आणि या जातींच्या भेदभावानेच मला आत्तापर्यँत खूपदा दुखावलं आहे .. 
मी अगदी जीवापाड प्रेम केलं अशा लोकांना सुद्धा दूर केलं आहे या जातींनी  .. 
आणि म्हणूनच , यापुढेही कधीच विचारणार नाही मी तिला तीच पूर्ण नाव .. कधीच नाही ... 
               
                                                                   
                                                                                           - सुधीर  


Tuesday, 13 September 2016

सोप्प होत ...


सोप्प होत तुझं उत्तर 
बस ,माझा प्रश्नच जरा अवघड होता 
तरीपण 
बदलावं तुझं उत्तर यासाठी 
      माझा जीव का अडकला होता ...... 
           
                                                                                                                             - सुधीर


Saturday, 3 September 2016

कोणी आणि कोणीतरी ...

कोणी आणि कोणीतरी यांच्यातलं संभाषण फार मजेशीर होतं  .. 
कोणी कोणालातरी म्हणाले कि आजकाल कोणीही कोणालाच काहीही बोलायच्या किंवा सांगायच्या फंदात पडू नये .. कारण कोणाच्या कोणत्या बोलण्याचा कोण काय कसा आणि कोणता अर्थ काढेल हे कोणालाच सांगता येत नाही .. 
तेव्हा उत्तरादाखल ते कोणीतरीसुद्धा हेच म्हणाले कि कोणी कोणाच्याही बोलण्याचा काय आणि कोणता तो योग्य असा अर्थ काढेल हे कौशल्य कोणाकोणालाच जमत ,तेव्हा कोणाच्यातरी बोलण्याचा योग्य असा अर्थ काढू शकेल ,असे कोणीतरी भेटत नाही तोपर्यंत कोणीही कोणाचेही नाही असेच समजावे आणि म्हणूनच कोणीही कोणासही काहीही न बोललेले बरे ... 

                                                                                  - सुधीर