Sunday, 8 January 2017

जाणिवेचा एकटेपणा ...


गच्चीवर कठड्याला हात टेकवून दोघे निवांत उभे होते .. 
पण ती आज कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती .. 
हे जाणवताच त्याने विचारलं "काय झालं ? कसला विचार करत आहेस ?" .. 
ती "मला ना आज खूप एकटं-एकटं वाटत आहे ,का कुणास ठाऊक पण सर्व आपली अशी माणसं जवळ असून सुद्धा मला त्यांच्यात असल्यासारखं वाटत नाहीये .. एक वेगळाच एकांतपणा जाणवतोय मनात ,असं वाटत कि कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन नुसतं बसावं ,तासनतास फक्त बसून राहावं " .. 
तो "मला सुद्धा कधी कधी असंच वाटत .. किंबहुना मला तर वाटत की आपल्यालाच नाही तर सर्वांनाच कधी ना कधी हे असं नक्कीच वाटत असणार ,गर्दीमध्ये असूनसुद्धा हा एकटेपणा नक्कीच जाणवत असणार " .. 
ती "बाकीच्यांचं नाही माहित पण मला नाही आवडत रे हा नसलेला पण तरीही जाणवणारा एकटेपणा .. कधी भविष्यात मी खरंच एकटी पडली तर मग काय करू .. आत्ता फक्त जाणवणारा हा एकटेपणा एक दिवस खरंच माझ्या वाट्याला आला तर कस करू ?मला तर काळजीच वाटते " .. 
तिचं हे बोलणं ऐकताना तो काहीच नाही बोलता फक्त समोर दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत होता  .. 
शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं "तू काय करतोस रे असं एकटं एकटं वाटायला लागल्यावर ?? "
त्याने तिच्याकडं पाहिलं तर तिचा चेहरा एकदम चिंतातुर झाला होता .. 
तेव्हा तो गालातल्या गालात थोडंसं हसला आणि म्हणाला 
"एक काम कर .. ते समोर पसरलेलं क्षितिज पहा ,अगदी जिथपर्यंत तुझी आणि माझी नजर पोहोचते तिथपर्यंत पसरलेल ते क्षितिज .. एकाच वेळेला आभासी पण तरीही तितकच खरं आणि शाश्वत .. आणि असं उदाहरण दुसरं नाही सापडणार ,जे एकाच वेळी आभासी पण आहे आणि तितकंच खरं सुद्धा .. आभासी ,कधीही हाताला न येणारं .. जेवढं त्याच्या मागे जाशील तेवढं ते आणखीन पुढे पुढे सरकत जाणारं " .. 
"पण असं आभासी असूनसुद्धा ते शाश्वत असत आपल्या आयुष्यात .. तुझ्या-माझ्या आधीसुद्धा त्याच अस्तित्व होत ,आज आपण आहोत आणि तोसुद्धा आहेच आपल्यासोबत ,आणि आपल्यानंतरही त्याच अस्तित्व असेलच .. म्हणून कधीही एकटं-एकटं वाटलं ना कि मी या क्षितिजाकडे पाहतो .. तो असतो कायम इथे ,नेहमी माझ्या सोबत .. मी कुठेही गेलो तरी हा तिथे असतोच , मला कधीही एकटा पडू देत नाही हा .. आता इथे गच्चीवर सुद्धा आहे तो ,कधी एकट्याने प्रवास करताना खिडकीतून बाहेर पहिलं की हमखास दिसतोच तो ,कधी कधी निराशेने भरलेल्या एकट्या अशा काळोखाच्या रात्री खिडकीमध्ये येऊन पहिलं तरीसुद्धा तो असतोच तिथे ,जेव्हा जेव्हा एकटं-एकटं वाटलं तेव्हा तेव्हा तो सोबत होता आणि यापुढे सुद्धा असेलच " .. 
त्याच बोलणं ऐकण्यात हरवलेली ती नकळत त्या समोर दिसणाऱ्या क्षितिजाकडे पाहण्यात कधी गुंग झाली तिलासुद्धा नाही कळालं .. 

                                                                                                   - सुधीर


Thursday, 8 December 2016

एका प्रेमाची गोष्ट ..


ती "आज तू एवढा शांत शांत का आहेस ? काही झालंय का ?"
तो "तुला एक सांगू का ?"
ती "सांग ना ,त्यात विचारायचं काय "
तो "मला आजकाल भीती वाटते खूप तुझ्यासोबत बोलायची ."
     "कारण ,जेव्हा तुझ्याशी बोलतो ना तेव्हा असं कधीच होत नाही कि माझ्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरु आहेत ,आणि फक्त माझे ओठ हालत आहेत ,किंवा काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत असतो असं सुद्धा नाही .. खरं तर तुझ्याशी बोलताना मी नसतोच बोलत ,बोलत असत ते माझं मन .. आणि हे मन इतक्या आवेगानं ,इतक्या इच्छाशक्तीनं सर्व मनातले शब्द ,सर्व भावना बाहेर पाठवत असत कि या ओठांनाही शक्य होत नाही त्यांना थांबवणं ."
    "आणि मी या आधी कोणासमोरही जेव्हा जेव्हा माझं मन असं मोकळं तेव्हा तेव्हा समोरच्या व्यक्तीने या मनाची किंमत नाही केली .. म्हणून भीती वाटते तुझ्यासमोर मन मोकळं करायची ."
त्याच हे बोलणं ऐकून ती फक्त हलकंसं गालातल्या गालात हसली .काही क्षण ते दोघेही काहीच न बोलता फक्त समोरचा तो मावळणारा सूर्य पाहत उभे राहिले .. काही वेळाने तिने त्याचा हात हातात घेतला ,आणि पुन्हा ती त्या सूर्याकडे ,त्याच्या बदलत जाणाऱ्या मावळतीच्या रंगाकडे पाहत तशीच उभी राहिली ..
त्याला जाणवलं कि तिने त्याचा हात खूप घट्ट पकडून ठेवला आहे .. तिला काय म्हणायचंय हे त्याला समजलं .. आणि याच निःशब्द शांततेत ,समोर क्षणाक्षणाला मावळत जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने एक प्रेमाची ,एका विश्वासाची गोष्ट कदाचित सुरु झाली .... 



                                                                                              - सुधीर


Sunday, 25 September 2016

तेव्हा आणि तिथूनच ...



                   हो ,जेव्हा कोणीतरी एकदम जवळच असं दूर जातं ,तेव्हा मनाला त्रास तर होतोच .. पण खरं तर यांच्यानंतरच इतके दिवस समोर असूनही दिसत नसलेलं असं ते सत्य आपल्याला दिसायला लागत .. सत्य स्वतःबद्दलच .. आणि तिथूनच खरी सुरुवात होते शोधाची .. शोध सुरु होतो स्वतःचा .. म्हणूनच असं म्हणता येईल की ,गवसल्यानंतर कोणीतरी हरवलं जरी तरी त्या हरवण्यातूनसुद्धा काहीतरी गवसतंच ,नाही का  ...  
जेव्हा आयुष्यातून कुणीतरी 
एकदम जवळचं हरवत ना ,
तेव्हा आणि तिथूनच 
स्वतःचा खरा शोध सुरु होतो ... 

                                                                                                                                 - सुधीर

Sunday, 18 September 2016

कधीच नाही ...


नाही .. 
मी नाही विचारलं तिला .. कारण इच्छाच झाली नाही विचारायची .. 
मी नाही विचारलं तिला तिचं पूर्ण नाव .. कारण पूर्ण नाव म्हटलं कि आडनाव सुद्धा त्यात आलंच .. आणि मला खरंच नाही जाणून घ्यायचं तीच आडनावं .. 
कारण आडनाव म्हटलं कि त्यात लपून-छपून 'जात' सुद्धा येतेच ,आणि या जातींच्या भेदभावानेच मला आत्तापर्यँत खूपदा दुखावलं आहे .. 
मी अगदी जीवापाड प्रेम केलं अशा लोकांना सुद्धा दूर केलं आहे या जातींनी  .. 
आणि म्हणूनच , यापुढेही कधीच विचारणार नाही मी तिला तीच पूर्ण नाव .. कधीच नाही ... 
               
                                                                   
                                                                                           - सुधीर  


Tuesday, 13 September 2016

सोप्प होत ...


सोप्प होत तुझं उत्तर 
बस ,माझा प्रश्नच जरा अवघड होता 
तरीपण 
बदलावं तुझं उत्तर यासाठी 
      माझा जीव का अडकला होता ...... 
           
                                                                                                                             - सुधीर


Saturday, 3 September 2016

कोणी आणि कोणीतरी ...

कोणी आणि कोणीतरी यांच्यातलं संभाषण फार मजेशीर होतं  .. 
कोणी कोणालातरी म्हणाले कि आजकाल कोणीही कोणालाच काहीही बोलायच्या किंवा सांगायच्या फंदात पडू नये .. कारण कोणाच्या कोणत्या बोलण्याचा कोण काय कसा आणि कोणता अर्थ काढेल हे कोणालाच सांगता येत नाही .. 
तेव्हा उत्तरादाखल ते कोणीतरीसुद्धा हेच म्हणाले कि कोणी कोणाच्याही बोलण्याचा काय आणि कोणता तो योग्य असा अर्थ काढेल हे कौशल्य कोणाकोणालाच जमत ,तेव्हा कोणाच्यातरी बोलण्याचा योग्य असा अर्थ काढू शकेल ,असे कोणीतरी भेटत नाही तोपर्यंत कोणीही कोणाचेही नाही असेच समजावे आणि म्हणूनच कोणीही कोणासही काहीही न बोललेले बरे ... 

                                                                                  - सुधीर


Friday, 26 August 2016

हसणं ..

कधी गालातल्या गालात 
तर कधी मोकळेपणानं 
असं तुझं ते गोड हसणं
आणि ते हसणं पाहून 
माझ्या मनाचं सारखं सारखं फसण ...


असं हे हसणं .. आणि माझं त्या हसण्यात फसण .. 
पण खरच कमाल असते ना या हसण्याची .. नातं निर्माण करायची आणि तेवढ्याच ताकदीने ते नष्ट करायची जादू या 'हसणं' नावाच्या गोष्टी मध्ये असते .. दोघांच्या हसण्याची लय जुळली कि तिथे जुळतो मैत्रीचा एक धागा दुसऱ्या धाग्याला .. आणि जेव्हा कोणाचंतरी गोड असं ते हसणं अगदी मनापासून आवडायला लागत ना तेव्हा सुरुवात होते एका नाजूक अशा प्रेमाच्या नात्याला .. तर दुसरीकडे जेव्हा कोणी कोणावर तरी हसतं तेव्हा मात्र ग्रहण लागत त्या नात्याला .. म्हणजेच काय तर कोणीतरी कोणावर हसलं म्हणून नाती तुटतात सुध्दा ,आणि कोणालातरी कोणाचतरी हसणं आवडलं म्हणून नाती जुळतात सुद्धा ..

सर्वांचं हसणं तसं पहायला गेलं तर असत वेगळं .. कुणाचं हसणं असतं एकदम गोडं ,तर कुणी एकदम मोकळेपणानं हसतं .. कोणाचं हसणं असत थोडं लाजरं ,अगदी गुपचूप .. तर कोणी हसत अगदी बिनदास्त ,सगळ्या जगाला ऐकू जावं अशा आवाजात .. कोणी कोणी हसताना अक्षरशः सर्व दात दाखवतात ,तर काहीजण फक्त समोरच्याला दातांच्या मुख दर्शनाचा लाभ देतात .. कोणी हसताना सर्व अंग गदागदा हलवून हसत तर कोणी हसताना गालावर एक छान अशी खळी पाडून शोभतं .. हसण्याच्या अशा वेगवेगळ्या तऱ्हा .. तरी एक गोष्ट मात्र नक्की .. हसणं हे नेहमी सुंदरच असत ,फक्त ते मनापासून असायला हवं .. 
                     माझ्या मते तर या जगातली कोणतीही व्यक्ती जेव्हा अगदी मनमोकळेपणानं ,अगदी मनापासून हसते ना त्या वेळेला ,त्या क्षणी ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती दिसत असते .. मग ते अजूनही दात न आलेल्या लहानशा इवल्याशा बाळाचं हसणं असो किंवा वय आणि दात दोन्ही निघून गेलेल्या जख्खडं म्हाताऱ्याचं हसणं असो .. 

पण या हसण्याला आपण भीतीच आवरण घालून आजकाल खोटं खोटं हसत आहोत .. कोणीतरी माझ्याकडे पाहून हसेल या भीतीने आपण खरं तर मोकळेपणानं हसण्याच्या या गंमतीपासून दूर जातोय .. माहित नसलेल्या भविष्याची चिंता ,सोबतच्या लोकांचं चुकीचं वागणं ,यशापयश मिळवताना आलेली प्रतिकूल परिस्थिती या असल्या गोष्टी कुठेतरी तुमचं ते हक्काचं हसणं तुमच्यापासून हिरावून घेतायेत ,किंबहुना तुम्ही त्या हिरावून घेऊ देताय .. तेव्हा सर्व भीती सर्व चिंता सोडून फक्त मनमोकळं हसा ,अगदी मनापासून हसा .. मनापासून हसणाऱ्यांना पावलोपावली आनंद देणाऱ्या गोष्टी दिसतील ,पण जर या हसण्यालाच जर भिऊन राहिलो तर मात्र पावलोपावली फक्त चिंताच दिसेल .. पुढचा क्षण ना तुम्हाला माहित ना मला ,आणि ज्याला माहित आहे तो देव ,तो तर वरती बसून तुमच्या या वागण्याकडे पाहून स्वतःच हसत असेल ..

           तेव्हा सर्व चिंता ,सर्व काळजी सोडून द्या आणि बस मनापासून .मनमोकळं हसा .. मग पहा आयुष्य किती सुंदर दिसू लागत ते .. आणि मग तुमचंही मन समोरच्याच्या हसण्यात कसं फसू लागत ते ..
                             

                                                                                   - सुधीर